Ajinkya Rahane : झिरोवर आऊट, तरीही अजिंक्य रहाणे याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सूर्याला पछाडलं

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अनेक खेळाडू उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे याने झिरोवर आऊट होऊनही सूर्यकुमार यादव याचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

Ajinkya Rahane : झिरोवर आऊट, तरीही अजिंक्य रहाणे याची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, सूर्याला पछाडलं
Suryakumar Yadav and Ajinkya Rahane
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 28, 2025 | 9:16 PM

सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली टी 20i स्पर्धेचा थरार रंगत आहे. पृथ्वी शॉ याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करत महाराष्ट्राला जिंकवलं. पृथ्वी शॉ गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियामधून बाहेर आहे. तशीच स्थिती अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याची आहे. अजिंक्यला निवड समितीकडून कसोटी संघात स्थान दिलं जात नाहीय. अजिंक्यही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळतोय. अजिंक्य विदर्भ विरूद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. अजिंक्यला भोपळाही फोडता आला नाही. मात्र अजिंक्यने त्यानंतरही एक रेकॉर्ड केला.

अजिंक्यने याआधीच्या सामन्यात रेल्वे विरुद्ध अर्धशतकी खेळी केली होती. अजिंक्यने रेल्वे विरुद्ध 68 धावांची खेळी केली होती. त्यामुळे अजिंक्यकडून विदर्भ विरुद्ध अशाच खेळीची अपेक्षा होती. अजिंक्य या सामन्यात मुंबईकडून ओपनिंगला आला. मात्र अजिंक्यला खातंही उघडता आलं नाही. अजिंक्यला 2 बॉलमध्ये 1 धावही करता आली नाही. दर्शन नळकांडे याने अजिंक्यला आऊट केलं. अजिंक्यने झिरोवर आऊट होताच नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

अजिंक्य टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट होणारा मुंबईकर फलंदाज ठरला. अजिंक्यची ही झिरोवर आऊट होण्याची सहावी वेळ ठरली. अजिंक्यने यासह पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव या दोघांना मागे टाकलं. सूर्या आणि पृथ्वी दोघेही मुंबईकडून खेळताना 5 वेळा झिरोवर आऊट झाले होते.

अजिंक्य रहाणेची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

अजिंक्यला विदर्भ विरुद्ध काही खास करता आलं नाही. मात्र अजिंक्यने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अजिंक्यने 205 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 14 हजार 209 धावा केल्या आहेत. अजिंक्यने या दरम्यान 42 शतकं आणि 59 अर्धशतकं झळकावली आहेत.

तसेच अजिंक्यने 192 लिस्ट ए क्रिकेट सामन्यांमध्ये जवळपास 7 हजार धावा केल्या आहेत. अजिंक्यने 6 हजार 853 रन्स केल्या आहेत. अजिंक्यने या दरम्यान 10 शतकं केली आहेत. तसेच मुंबईच्या या अनुभवी फलंदाजाने टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार 304 धावा केल्या आहेत.

मुंबईचा सलग दुसरा विजय

दरम्यान मुंबईचा हा एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. मुंबईने रेल्वेनंतर विदर्भाला पराभूत केलं. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान युवा आयुष म्हात्रे याच्या शतकी खेळीच्या जोरावर सहज पूर्ण केलं. आयुषने 110 धावांची खेळी केली. ऑलराउंडर शिवम दुबे याने 39 आणि सूर्यकुमार यादव याने 35 धावांचं योगदान दिलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 194 रन्स केल्या.