लॉर्ड्सच्या बालकनीत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात वाजलं? Video वरून सोशल मीडियावर चर्चा
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीतो रोहित-गौतम यांच्यात काहीतरी गंभीर चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

भारत आणि इंग्लंड वनडे मालिका आता संपली आहे. भारताचा पराभव झाल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संताप आहे. पण दुसरीकडे, रोहित शर्माच्या बातम्यांनी वातावरण तापलं आहे. वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने शतक ठोकलं आणि टीकाकारांची तोंड बंद केली. कारण लॉर्ड्सवरील वनडे सामन्यापूर्वी बऱ्याच वावड्या उठल्या होत्या. रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवटचा सामना वगैरे वगैरे… पण रोहित शर्माने त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या शतकाने दिली. रोहित शर्माने लॉर्ड्सवर 138 धावांची ऐतिहासिक खेळी केली. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. टीम इंडियाने सामना गमावला असला तरी रोहित शर्मासाठी शतक किती महत्त्वाचं होतं? याचा अंदाज त्याच्या चाहत्यांना आहे. पण एका व्हिडीओने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. लॉर्ड्सच्या बालकनीत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात काहीतरी चर्चा झाल्याचं दिसत आहे.
रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात भांडण झालं?
रोहित शर्माने शतक ठोकलं आणि लॉर्ड्सच्या बालकनीत बसला. तेव्हा त्याच्यासोबत गंभीर देखील होता. संघातील इतर कोणतेही खेळाडू तिथे नव्हते. त्यामुळे या दोघांमध्ये काही गंभीर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. दोघांचे हावभाव बरंच काही सांगून जात आहेत. पण नेमकी काय चर्चा रंगली याबाबत अधिकृत काहीच समोर आलेलं नाही. रिपोर्टनुसार, रोहित शर्माला शतकी खेळीनंतर टीमबाहेर करण्याची तयारी निवडकर्त्यांनी केली आहे. पण नेमकं काय खरं आणि काय खोटं? याबाबत काहीच पुढे आलेलं नाही. त्यामुळे पुढच्या मालिकेसाठी संघाची निवड झाल्यानंतर काय ते स्पष्ट होईल.
Rohit Sharma having an intense conversation with Gautam Gambhir after his century. 👀 pic.twitter.com/0f6v6Na8Ww
— Wickets Hitting (@offpacedelivery) July 19, 2026
रोहित शर्माची पुढच्या वनडे मालिकेत निवड होते की नाही? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. वेस्ट इंडिज तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात येणार आहे. ही मालिका 27 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान होईल. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. ही मालिका 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान होईल. बीसीसीआयच्या निवड समितीच्या नियमानुसार किंवा आधीच्या संघ घोषणेचा अंदाज घेता. कोणत्याही आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी संघाची निवड 15 ते 20 दिवस आधी होते. म्हणजेच आता रोहित शर्माबाबत खरं काय ते सप्टेंबर महिन्यात स्पष्ट होईल.