T20 WC 2026 : पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीने पकडलेला रिले झेल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पाकिस्तानसाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. कारण आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारताला फटका बसला होता.

T20 WC 2026 : पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेला झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video
पहिल्याच सामन्यात बाबर-शाहीनने पकडलेले झेल वादाच्या भोवऱ्यात, झालं असं की.. Video
Image Credit source: video grab/Twitter
| Updated on: Feb 07, 2026 | 3:59 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील पाकिस्तान नेदरलँड सामना चर्चेत राहिला. कारण नेदरलँडविरूद्धचा विजय पाकिस्तानला काही सहज मिळाला नाही. यासाठी शेवटच्या षटकापर्यंत झुंज द्यावी लागली. 19 व्या षटकात फहीमने 24 धावा ठोकल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला. पण या सामन्यातील नेदरलँडच्या डावात एक झेल पकडला गेला. हा झेल सध्या सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदु ठरला आहे. त्याला कारणही तसंच आहे. कारण आयसीसीने जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रिले झेलबाबत एक नियम जाहीर केला होता. तेव्हापासून रिले झेल घेताना काळजी घ्यावी लागत आहे. पण हा नियम पाकिस्तानला लागू होत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पाकिस्तानकडून पाचवं षटक टाकण्यासाठी मोहम्मद नवाज आला होता. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मायकल लेविटने उत्तुंग फटका मारला. पण बाबर आझम लाँग ऑफवरून धावत आला आणि त्याने झेल पकडला. पण त्याचा समतोल बिघडल्याने सीमेपार जायच्या आत त्याने शाहीन शाह आफ्रिदीकडे चेंडू फेकला. शाहीन आफ्रिदीने झेल पकडला आणि मायकल लेविट बाद झाला. पण शाहीनने जेव्हा झेल पकडला तेव्हा बाबर आझम सीमेपार होता. त्यामुळे लेविटला बाद दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आयसीसी रिले कॅच नियम 19.5.2 नुसार, रिले कॅच घेताना सीमारेषा ओलांडणाऱ्या क्षेत्ररक्षकाने त्याच्या सहकाऱ्याला चेंडू पास केल्यानंतर लगेचच मैदानात परत यावं लागतं. अन्यथा त्याला नाबाद दिलं जातं. असं यापूर्वी टीम इंडियासोबत घडलं आहे. रायझिंग स्टार आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया ए संघाकडून नेहल वढेराने सदाकतचा झेल पकडताना बाहेर गेला. पण त्यापूर्वी त्याने चेंडू नमन धीरकडे पास केला होता. पण वढेरा सीमेपार असल्याने सदाकतला नाबाद दिलं. तेव्हा वाद झाला होता. पण पंचांनी हा नियम ठामपणे मांडला होता.

आता बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीने असाच झेल पकडला. पण पंचांनी यावेळी नियमाकडे कानाडोळा केला. यामुळे या नियमावरून क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. भारतासाठी वेगळा नियम आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.