गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि…

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीतील वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका सामना होत आहे. हा सामना भारताच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. या सामन्यात सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेची पकड होती. मात्र रोमारियो शेफर्डने चित्र बदललं.

गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि...
गेम फिरला! दक्षिण अफ्रिकेला रोमारियो शेफर्ड पडला भारी, नवव्या स्थानावर आला आणि...
Image Credit source: west indies cricket twitter
| Updated on: Feb 26, 2026 | 5:03 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर हा निर्णय योग्यच होता. कारण वेस्ट इंडिजचे आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाले. त्यामुळे या सामन्यावर दक्षिण अफ्रिकेची मजबूत पकड होती. वेस्ट इंडिजच्या 10.2 षटकात 83 धावा होत्या आणि 7 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिजचा स्कोअर 150च्या आत असेल असं वाटलं होतं. पण नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमारियो शेफर्डने सर्व चित्र पालटलं. नवव्या विकेटसाठी जेसन होल्डरसोबत 57 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. तसेच संघाला संकटातून बाहेर काढलं. वेस्ट इंडिजने 20 षटकात 8 गडी गमवून 176 धावा केल्या आणि विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेसाठी वाटतं तितकं सोपं नाही.

रोमारियो शेफर्डने नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 37 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार मारत नाबाद 52 धावांची खेळी केली. त्याने 140.54 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठव्या विकेटसाठी दुसऱ्या क्रमांकाची भागीदारी केली आहे. बेल्जियमच्या साबेर झखिल आणि सकलेने अलीने 2021 मध्ये आठव्या विकेटसाठी नाबाद 132 धावांची भागीदारी केली होती. वेस्ट इंडीजने टी20 मध्ये सहाव्यांदा आठव्या विकेटसाठी 50पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे, त्यापैकी सर्वच्या सर्व सहामध्ये रोमारियो शेफर्डचा सहभाग आहे हे विशेष.

पुरुषांच्या टी20 मध्ये नवव्या किंवा त्यापेक्षा कमी क्रमांकावरून 50 पेक्षा जास्त धावा करणारा रोमारियो शेफर्ड हा चौथा फलंदाज आहे. तर पूर्ण-सदस्यीय संघातून तन्झिम हसन सकीब (बांगलादेश) नंतर दुसरा आहे. त्याने गेल्या वर्षी लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 50 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाची धाकधूक वाढली

वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामना टीम इंडियाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यावरच उपांत्य फेरीचं गणित सुटणार आहे. हा सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला तर भारताला सोपी संधी आहे. पण हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला तर मात्र कठीण होईल. त्यामुळे दक्षिण अफ्रिका 177 धावांचं आव्हान गाठणार का? असा प्रश्न भारतीय क्रीडाप्रेमींना पडला आहे.  अन्यथा भारताला दोन्ही सामन्यात विजय मिळवण्यासोबत नेट रनरेटचं गणितही सोडवावं लागेल.

Follow Us