T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की…

IND vs PAK, T20 World Cup: भारत आणि पाकिस्तान यांच्या आयसीसी टी20 वर्ल्डकप वेळापत्रकानुसार 15 फेब्रुवारीला सामना होणार आहे. या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. का ते समजून घ्या.

T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की...
T20 WC 2026 : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया श्रीलंकेत जाणार, कारण की...
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 10:15 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत भिडणार हे स्पष्ट होतं. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 फेब्रुवारीला नियोजित आहे. हा सामना कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असल्याने तसंच वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. पाकिस्तानने राजकीय कारण पुढे करत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने न्यूट्रल ठिकाणी शिफ्ट केले आहेत. पण पाकिस्तानच्या कुरापती संपूर्ण जगाला परिचित आहेत. आता बांगलादेशवर अन्याय झाल्याचं कारण पुढे केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार दिला आहे. असं असलं तरी भारतीय संघ श्रीलंकेत जाणार आहे. त्याचं कारणंही तसंच आहे.

भारतीय संघ आयसीसी स्पर्धेत आयसीसीचा प्रोटोकॉल फॉलो करणार आहे. आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार, टीम इंडिया श्रीलंकेत जाईल. टीम इंडिया ठरल्याप्रमाणे सरावही करेल. त्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरं जाईल. इतकंच काय तर सामना सुरू होण्याच्या वेळेत मैदानात हजर असेल. जर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरला नाही तर सामनाधिकारी हा सामना रद्द करतील. टीम इंडिया या प्रक्रियाचं तंतोतंत पाळण करतील आणि नंतरच मैदान सोडतील. साखळी फेरीत भारताच्या वाटेला फुकटचे 2 गुण मिळणार आहेत. खरं तर दोन गुण विजयानंतर मिळतात. पण पाकिस्तानने बहिष्काराचा निर्णय घेतल्याने भारताला फायदा होणार आहे.

आयसीसीने स्पष्ट केलं की…

पाकिस्तानच्या निर्णयानंतर आयसीसीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या निर्णयावर विचार करण्यास सांगितलं आहे. तसेच एकत्र बसून यावर तोडगा काढण्याची अपील केली आहे. आयसीसीने स्पष्ट केलं की, ‘पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सूचनेची वाट पाहात आहोत. आयसीसी स्पर्धा स्पोर्टिंग प्रामाणिकपणा, स्पर्धा, सातत्य आणि निष्पक्षतेवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, निवडक सहभागामुळे स्पर्धेचे पावित्र्य आणि आत्मा कमकुवत होतो. तथापि, राष्ट्रीय धोरणांशी संबंधित बाबींमध्ये आयसीसी सरकारच्या भूमिकेचा आदर करते.’