टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हे तीन मोठे विक्रम तोडणं कठीण, जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. 2007 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली. यंदाचं 10वं पर्व असून या स्पर्धेतील तीन विक्रम अजूनही अबाधित आहेत. तसेच विक्रम मोडणंही कठीण आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार असून महिनाभर जेतेपदासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत काही विक्रम रचले आणि काही विक्रम मोडले जाणार यात काही शंका नाही. 2007 पासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली आहे. दर दोन वर्षांनी स्पर्धा होत असते. यंदा स्पर्धेचं दहावं पर्व असून भारत आणि श्रीलंकेकडे यजमान पद आहे. आतापर्यंत सहा संघांनी जेतेपदाची चव चाखळी आहे. भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया या संघाना जेतेपद मिळालं आहे. तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांची दोनदा जेतेपद मिळवलं आहे. दुसरीकडे, आतापर्यंत या स्पर्धेत तीन विक्रम अबाधित आहेत. हे विक्रम मोडणं तसं पाहिलं तर खूपच कठीण आहेत. चला जाणून घेऊयात याबाबत
वेगवान अर्धशतक : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम अष्टपैलू युवराज सिंगच्या नावावर आहे. या स्पर्धेच्या पहिल्या पर्वात त्याने इंग्लंडविरुद्ध अवघ्या 12 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. तसेच 16 चेंडूत 58 धावा खेळी केली होती. यात त्याने एका षटकात 6 षटकार ठोकत खळबळ उडवून दिली होती. युवराज सिंगने 362.50 च्या स्ट्राईक रेटने 3 चौकार आणि 7 षटकार मारत हा विक्रम रचला होता.
सर्वाधिक षटकार : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा आणखी एक विक्रम आहे. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 33 सामने खेळले आणि 63 षटकार मारले. आतापर्यंत या विक्रमाच्या जवळपास कोणी गेलं नाही. त्यामुळे हा विक्रमही या स्पर्धेत मोडणं कठीण दिसत आहे. अभिषेक शर्माकडून हा विक्रम मोडण्याची अपेक्षा आहे. पण यासाठी दोन तीन टी20 वर्ल्डकप खेळावे लागतील. तसेच फॉर्मही महत्त्वाचा आहे.
सर्वात मोठा विजय : टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयाची नोंद 2007 साली झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत हा विक्रम कायम आहे. श्रीलंकेने केनियाविरुद्ध 172 धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 260 धावा केल्या होत्या. पण केनियाचा संघ 88 धावांवर सर्वबाद झाला होता.
