
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयाचा नारळ फोडला. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी झाला, पण हा विजय सहज मिळाला नाही. नाणेफेकीचा कौल गमवला, फलंदाजी फेल गेली. असं असूनही भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत करत स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं. भारताने नुसतं अमेरिकेला हरवलं नाही, तर पाकिस्तानलाही अडचणीत आणलं आहे. त्याचं कारण असं की भारत, पाकिस्तान, नेदरलँड, अमेरिका आणि नामिबिया हे एकाच गटात आहे. प्रत्येक संघ आपल्या गटात चार सामने खेळणार आहे. यापैकी भारत-अमेरिका आणि पाकिस्तान-नेदरलँड यांनी पहिला सामना खेळला आहे. 7 फेब्रुवारीला पाकिस्तान नेदरलँड सामन्याने सुरुवात झाली. पाकिस्तानने हा सामना 3 गडी आणि 3 चेंडू राखून जिंकला. त्यामुळे त्यांना 2 गुण मिळाले आणि नेट रनरेट हा +0.240 इतका राहिला. त्यामुळे पाकिस्तानच्या नजरा या भारताच्या सामन्याकडे होत्या. भारतीय संघाने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढवली होती. पण अखेर भारताने विजय मिळवून पाकिस्तानलाही धोबीपछाड दिला आहे.
टी20 वर्ल्डकप ग्रुप ए मध्ये भारताने अमेरिकेला 29 धावांनी पराभूत केल्याने 2 गुण मिळाले. इतकंच काय तर नेट रनरेट हा +1.450 इतका झाला. त्यामुळे या गटात भारताने पहिलं स्थान काबीज केलं आहे. तर पाकिस्तान 2 गुण आणि +0.240 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. आता भारताचा पुढचा सामना नामिबियाशी, तर पाकिस्तानचा अमेरिकेशी होणार आहे. या सामन्यात खऱ्या अर्थाने पाकिस्तानचं स्पर्धेतील स्थान कळणार आहे. पाकिस्तानला हा सामना काहीही करून जिंकवाच लागणार आहे. कारण सद्यस्थितीत पाकिस्तानने भारताविरुद्ध सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जर ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर भारताला 2 गुणांचा फायदा होईल. इतकंच काय तर पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान डळमळीत होईल. तसेच अमेरिकेला सुपर 8 फेरीसाठी संधी मिळू शकते.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे असंच काहीसं या स्पर्धेत घडलं तर पाकिस्तान संघ अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे त्यांना भारताविरुद्ध न खेळण्याचा आपला निर्णय मागे घ्यावा लागू शकतो. भारताविरुद्ध सामना खेळण्याशिवाय त्यांना पर्याय उरणार नाही. नाही तर स्पर्धेतून न खेळताच गाशा गुंडाळावा लागू शकतो. भारत पाकिस्तान सामना 15 फेब्रुवारीला नियोजित आहे.