
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. यासाठी दोन्ही संघ मुंबईत दाखल झाले आहेत. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी सराव सुरू केला आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वी भारतीय संघ कोलकात्यात होता. वेस्ट इंडिजविरूद्धचा सामना संपल्यानंतर भारतीय संघ 2 मार्चला मुंबईत दाखल झाला. तसेच 3 मार्चपासून सराव सुरू करणार होते. पण चंद्रग्रहणामुळे या सरावावर प्रभाव पडल्याची चर्चा रंगली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारताचा सराव फ्लडलाइड प्रकाशात संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान निश्चित केला होता. पण भारतीय खेळाडू मैदानात उशिराने दाखल झाले. 7 वाजून 20 मिनिटं झाल्यानंतर भारतीय खेळाडू मैदानात सरावासाठी उतरले. इतकंच काय तर स्टेडियममधील लाईट 6 वाजून 50 मिनिटांपर्यंत बंद होत्या. त्यानंतर त्या सुरू करण्यात आल्या.
चंद्रग्रहणादरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने वैदिक नियम पाळल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. भारतीय खेळाडू सरावासाठी हॉटेलमधून स्टेडियमवर पोहोचले होते. फक्त हार्दिक पांड्या एकमेव असा खेळाडू होता की बसऐवजी स्वत:च्या गाडीतून मैदानात आला. टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्य खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या आधीच मैदानात पोहोचले होते. पण त्यांच्या आगमनानंतरही सराव काही वेळेत सुरू झाला नाही. चंद्रग्रहणामुळे सरावाची वेळ लांबवली अशी चर्चा आता क्रीडावर्तुळात रंगली आहे. कारण चंद्रग्रहणाची वेळ 3 तास 27 मिनिटांची होती. दुपारी 3 वाजून 21 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू झालं आणि 6 वाजून 47 मिनिटांनी संपलं. त्यानंतरच सरावाला सुरूवात झाली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. वानखेडे मैदानावर हा सामना असल्याने मोठी धावसंख्या होईल अशी चर्चा आहे. कारण हे मैदान तुलनेनं छोटं आहे आणि खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे या सामन्यात धावांचा पाऊस पडेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा वानखेडेवरील दुसरा सामना आहे. यापूर्वी अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे विजय मिळवणं सोपं झालं होतं. तर इतर खेळाडूंनी नांगी टाकली होती. अभिषेक शर्माला तर खातंही खोलता आलं नव्हतं. तर इंग्लंडचा या मैदानावर तिसरा सामना आहे. दोन पैकी एका सामन्यात थोडक्यात विजय मिळाला. तर एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.