
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील चारही सामने भारताने आपल्या झोळीत टाकले. या स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांची कसोटी लागली. पण भारताने विजयी घोडदौड कायम ठेवली. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला पराभूत केलं. या सामन्यात भारतीय फलंदाजीचा कस लागला होता. पण भारताने बाजी मारली. नामिबियाविरूद्धचा दुसरा सामना भारताने सहज जिंकला. तर पाकिस्तानला कोलंबोत जाऊन पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारताने सुपर 8 फेरीत जागा पक्की केली होती. त्यामुळे नेदरलँडविरुद्धचा सामना औपचारिक होता. पण नेदरलँडने हा विजय काही सहज दिला नाही. शिवम दुबेची बॅट चालली म्हणून 193 धावांपर्यंत मजल मारता आली. नाही तर गणित खूपच कठीण झालं असतं. भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने 176 धावांपर्यंत मजल मारली आणि सामना 17 धावांनी गमावला. या सामन्यात भारताने एकूण 7 गोलंदाज वापरले. इतके गोलंदाज वापरल्याने समालोचकांनही आश्चर्य व्यक्त केलं. हा काही सराव सामना नाही असंही अनेकांनी मत नोंदवलं. यावर सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं.
सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘कधीकधी गोलंदाजीचे पर्याय असणे एक चांगले डोकेदुखी असते. माझ्याकडे मध्यभागी किती गोलंदाज आहेत? अभिषेक शर्मा आहे, नंतर हार्दिक, दुबे. तर माझ्याकडे मध्यभागी बरेच पर्याय आहेत. ते काहीही असो, दिलेल्या दिवशी, विकेटची मागणी काहीही असो, मला वाटते की ते काही षटकांमध्ये मदत करू शकतात.’ अर्शदीप सिंगने 3, जसप्रीत बुमराहने 3, वॉशिंग्टन सुंदरने 4, वरूण चक्रवर्तीने 3, हार्दिक पांड्याने 3, अभिषेक शर्माने 1 आणि शिवम दुबेने 3 षटकं टाकली.
फलंदाजाच्या फॉर्मावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ज्या पद्धतीने पुढे जात आहेत त्यावर मी खूप आनंदी आहे. योगदान जवळजवळ प्रत्येक फलंदाजाकडून येत आहे. मला तेच हवे आहे, त्या छोट्या, छोट्या भागीदारी. जेव्हा खेळ थोडासा कठीण असतो, तेव्हा एक किंवा दोन फलंदाजांचा दिवस चांगला जाऊ शकतो, परंतु नंतर चांगली धावसंख्या गाठण्यासाठी आपल्याला सर्व फलंदाजांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते.’
सूर्यकुमार यादवने काही क्षेत्रात काम करण्याची गरज असल्याचं सांगितलं. ‘तुम्ही असे म्हणू शकत नाही की आम्ही जवळजवळ सर्व बॉक्स टिक केले आहेत, पण तुम्ही जिंकलात तरी तुम्ही त्यातून काहीतरी शिकता. आणि आम्ही काही क्षेत्रे शिकलो आहोत. आम्ही रूममध्ये परत जाऊ, उद्या एक दिवस सुट्टी घेऊ आणि त्यावर गप्पा मारू.’, असं सूर्यकुमार म्हणाला.