टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने रचला कट, भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा संताप

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ एक सराव सामना खेळणार आहे. पण या सराव सामन्यापूर्वी श्रीलंकेच्या कृतीने भारतीय संघाचं डोकं फिरलं आहे. नेमकं काय झालं आणि कशासाठी ते जाणून घ्या.

टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने रचला कट, भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा संताप
टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी श्रीलंकेने रचला कट, भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षकांचा संताप
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 06, 2026 | 9:52 PM

भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून या कसोटी मालिकेत विजयी झेंडा फडकवण्याचा प्रयत्न आहे. यासाठी भारतीय संघ मालिकेच्या दहा दिवस आधीच श्रीलंकेत ठाण मांडून आहे. श्रीलंकेतील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहे. तसेच एक सराव सामना खेळून अभ्यास किती झाला आहे, याची चाचपणी करणार आहे. हा सराव सामना श्रीलंकेन लोकल संघाशी 7 ऑगस्ट रोजी आहे. तीन दिवसीय सामना असून भारतीय संघ यासाठी सज्ज झाला आहे. पण या सामन्यासाठी तयार केलेली खेळपट्टी पाहून भारतीय संघ व्यवस्थापनाचा पारा चढला आहे. माहितीनुसार, कोलंबोच्या ‘नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब’मधील खेळपट्टीवर गरजेपेक्षा जास्त गवत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू नाराज झाले आहेत.

गवताळ खेळपट्टीमुळे भारतीय खेळाडूंची नाराजीचं कारण काय?

गवताळ खेळपट्टी पाहून भारतीय खेळाडू नाराज होण्याचं कारण काय? त्याचं असं की श्रीलंकेत फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या असतात. गॉल कसोटीत फिरकीला मदत करणारी खेळपट्टी आहे. त्यामुळे सराव सामन्यात भारतीय संघाला तशाच खेळपट्टीची अपेक्षा होती. पण कोलंबोच्या ‘नॉनडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब’मधील खेळपट्टी त्याच्या अगदी उलट आहे. गवताळ खेळपट्टीवर चेंडूला जास्त उसळी आणि स्विंग मिळतो. त्यामुळे फिरकीचा हवा तसा सराव करता येणार नाही. त्यात मुख्य मालिकेपूर्वी मुख्य फलंदाजांना दुखापत होऊ नये आणि त्यांनी  फिरकी परिस्थितीचा सराव करावा, हाच उद्देश होता. पण तसं काहीच नसल्याने नाराजी असणं सहाजिकच आहे. भारतीय संघाने खेळपट्टीच्या क्युरेटरशी या विषयावर चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की श्रीलंकन ​​बोर्डाकडून तसे करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

तीन दिवसांच्या सामन्यात गवताळ खेळपट्टी का?

नॉनडिस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लबचे अधिकारी ए. फ्रँक म्हणाले, “भारतीय संघाने खेळपट्टीवर खूप गवत असल्याने आक्षेप घेतला आहे. पण तीन दिवसांचा सामना असल्यामुळे आम्ही ते तसेच ठेवले. आम्ही गवताशिवाय खेळपट्टी देऊ शकलो नसतो. आम्ही दिलेली खेळपट्टी चांगली आहे, त्यामुळे ती दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरेल की नाही हे मी आता सांगू शकत नाही. हे त्यांच्या खेळण्याच्या शैलीवर अवलंबून आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us