
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ भिडणार आहे. हा सामना 8 मार्च रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानात भारताने वनडे वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. या स्पर्धेत एकही सामना भारताने गमावला नव्हता. पण अंतिम सामन्यात पराभव झाल्याने हिरमोड झाला आणि जेतेपदाचं स्वप्न भंगलं. इतकंच काय टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत या मैदानात दोन खेळले होते. पहिल्या सामन्यात भारताने नेदरलँडला 17 धावांनी पराभूत केलं. पण सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. भारताचा टी20 क्रिकेटची या मैदानातील आकडेवारी काही वाईट नाही. भारताने या मैदानात 10 टी20 सामने खेळले आहे. त्यात 7 सामन्यात विजय आणि 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यापूर्वी दोन बदल केले आहेत.
मिडिया रिपोर्टनुसार, अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या हॉटेल आणि स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये बदल केला आहे. हा निर्णय नकारात्मक भुतकाळ पुसून काढण्यासाठी केला असल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे. हा बदल नवी सुरूवात असणार आहे. रिपोर्टनुसार, वनडे 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, ते हॉटेल नाकारलं आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम ड्रेसिंग रूम ऐवजी विजिटिंग संघाचं ड्रेसिंग रूम वापरण्याची शक्यता आहे. संघाच्या आध्यात्मिक विचारसरणीला अनुसरून हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, हॉटेल बदलण्यामागे काहीही चर्चा रंगली असली तरी आयसीसी प्रोटोकॉलनुसार, अहमदाबादमधील पहिला अंतिम फेरीत पोहोचणारा संघआयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये राहणार होता. या हॉटेलमध्ये भारतीय संघ 2023 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात थांबला होता. तर दुसरा संघ ताज स्कायलाइनमध्ये राहील असं स्पष्ट होतं. पण ड्रेसिंग रूम बदलण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड सामन्याआधी झालेल्या सराव शिबिरात असं चित्र पाहायला मिळालं होतं. तेव्हा चंद्रग्रहणामुळे भारताने सराव उशिराने सुरू केला होता.