0,0,0,0,0,0,0,0,0,0,0… टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड, पाच सामन्यात झालं असं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भारतीय संघाचा 76 धावांनी पराभव झाल्याने उपांत्य फेरीची वाटही बिकट झाली आहे. असं असताना भारतीय फलंदाजांनी शून्यावर बाद होण्याचा विक्रम रचला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताच्या पदरी पहिल्याच सामन्यात निराशा पडली आहे. दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली. यामुळे भारताचं नेट रनरेटचं गणित बिघडलं आहे. दक्षिण अफ्रिकने 187 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय संघ 111 धावांवरच गारद झाला. या पराभवासह भारताने एक लाजिरवाणा पराभवही आपल्या नावावर केला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम रचला आहे. जागतिक क्रमवारीत नंबर 1 असलेल्या संघाचे फलंदाज 11 वेळा शून्यावर बाद झाले आहे. यात अभिषेक शर्माचं नाव आघाडीवर येत आहे. त्याला या स्पर्धेत तीन वेळा खातंही खोलता आलं नाही. अक्षर पटेल दोन वेळा शून्यावर बाद झाला. तर शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि रिंकु सिंह प्रत्येकी 1 वेळा शून्यावर बाद झाले आहे.
टीम इंडियाचे फलंदाज इतक्यांदा शून्यावर बाद झाल्याने दुबळ्या इटली संघालाही मागे टाकलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी जागतिक पातळीवर पुरती लाज घालवली आहे. इटली संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कामगिरीची तुलना आता करता येणार नाही. पण भारताने त्यांनाही मागे टाकलं आहे. इटलीचे फलंदाज 8 वेळा शून्यावर बाद झाले होते. तर ओमानचे फलंदाज 7 वेळा आणि पाकिस्तानचे 6 वेळा शून्यावर बाद झाले आहेत. त्यामुळे या सर्वांना मागे टाकत भारतीय संघ आघाडीवर आहे. खरं तर भारतीय संघाचा टी20 क्रिकेटमधील दबदबा पाहता ही लाजिरवाणी बाब आहे.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या तीन फलंदाजांना खातं खोलता आलं नाही. यात फॉर्मात असलेला इशान किशनचा नंबर पहिल्या स्थानावर आहे. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. इशान किशननंतर रिंकु सिंह आणि जसप्रीत बुमराह हे देखील शून्यावर बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव 111 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताची पुढची वाट बिकट झाली आहे. भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेच्या कामगिरीवर सर्व काही अवलंबून असणार आहे.
