Yogi Adityanath : पाकिस्तान म्हणजे आजार, कपिल देव यांच्या रुग्णालयाच्या उद्घाटनादरम्यान योगींचा शेजाऱ्यांवर हल्लाबोल
KDSG Super Specialty Hospital : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एका दगडात 2 पक्षी मारले. योगींनी भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. तसेच देव यांना डॉक्टराची उपमा देत पाकिस्तान म्हणजे आजार असल्याचं त्यांनी म्हटलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते गुरुवारी 5 मार्च रोजी भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव यांच्या मालकीच्या रुग्णलयाचं उद्घाटन करण्यात आलं. योगींच्या हस्ते ग्रेटर नोएडा स्थित केडीएसजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनप्रसंगी विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते. योगी आदित्यनाथ यांनी यावेळेस उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर आणि रुग्णातील नात्यावर भाष्य केलं. तसेच आदर्श डॉक्टर कसा असावा यावरही योगी आदित्यनाथ यांनी संबोधन केलं.
आरोग्यसेवा फक्त उपचारांपुरती मर्यादित नसते. तर आरोग्य सेवा डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विश्वास आणि मानवी व्यवहार यातही निर्णायक भूमिका बजावते असं योगींनी यावेळेस नमूद केलं. तसेच यावेळेस योगी यांनी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या उपस्थितीत शेजारी पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
योगी काय म्हणाले?
आप बीमारी की तुलना पाकिस्तान से कर लें तो यह मान कर चलिए कि… pic.twitter.com/Pko2R9rsOJ
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 5, 2026
डॉक्टर तगडा असेल तर आजार सहज संपतो, हे पटवून देण्यासाठी योगी यांनी क्रिकेटचं उदाहरण दिलं. योगी यांनी क्रिकेटचं उदाहरण देताना कपिल देव यांना डॉक्टरांची तर आजाराला पाकिस्तानची उपमा दिली. योगी यांनी कपिल देव यांना डॉक्टर सांगत आजार म्हणजे पाकिस्तान असल्याचं म्हटलं. “कपिल देव जेव्हा बॉलिंग करायचे तसेच ते जेव्हा कर्णधाराच्या भूमिकेत असायचे तेव्हा पाकिस्तानने निम्मा सामना तिथेच गमावलेला असायचा”, असं योगींनी नमूद केलं.
“डॉक्टरने चांगल्या वागणूकीसह योग्य उपचार दिल्यास आणि आपुलकीने विचारपूस केल्यास रुग्णाचा अर्धा आजार बरा होतो”, असंही योगींनी म्हटलं.
“डॉक्टरवर विश्वास असल्यास…”
योगींनी रुग्णाचा डॉक्टरवर विश्वास असणं किती महत्त्वाचं असतं हे यावेळेस बोलताना नमूद केलं. “डॉक्टरवर विश्वास असतो तेव्हा रुग्णाची आजाराविरुद्ध मानसिकरित्या लढण्याची ताकद वाढते. त्यानंतर औषध आणि प्रार्थनेचाही (दवा आणि दुवा) फायदा होतो. योग्य उपचार केल्यास डॉक्टरला आशीर्वाद मिळतो. तर रुग्णाला योग्य उपचार आणि औषध मिळाल्यास तो लवकर बरा होतो. रुग्ण बरा झाल्यास समाजात हॉस्पिटलबाबत एक प्रतिमा तयार होते. तसेच डॉक्टरांबाबत जनसामांन्यांमध्ये सम्मान वाढीस लागतो, असंही योगी म्हणाले.
