IND vs ENG Preview : विराट 5 महिन्यानंतर T20 खेळणार, चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतीक्षा, गेल्या सामन्यांमधील कामगिरी कशी? जाणून घ्या…

IND vs ENG Preview : विराट कोहलीवर त्याच्या दीर्घकाळच्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी प्रचंड दबाव असेल. कोहलीनं फेब्रुवारीमध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे विराटच्या आजच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे.

IND vs ENG Preview : विराट 5 महिन्यानंतर T20 खेळणार, चाहत्यांना त्याच्या शतकाची प्रतीक्षा, गेल्या सामन्यांमधील कामगिरी कशी? जाणून घ्या...
विराट कोहली
Image Credit source: social
| Updated on: Jul 09, 2022 | 5:05 PM

नवी दिल्ली :  आज इंग्लंडविरुद्धच्या (England vs India 2nd T20I) दुसऱ्या सामन्याद्वारे पाच महिन्यांनंतर टी-20 (T20I) क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीवर (Virat Kohli) त्याच्या दीर्घकाळच्या खराब फॉर्ममधून बाहेर पडण्यासाठी प्रचंड दबाव असेल. कोहलीनं फेब्रुवारीमध्ये शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या T20 विश्वचषकात भारताच्या खराब कामगिरीनंतर तो फक्त दोन T20 खेळला आहे. यादरम्यान तो फक्त आयपीएलमध्ये टी-20 क्रिकेट खेळला पण त्यातही चांगली कामगिरी करू शकला नाही. तर आजच्या सामन्यात भारताला ‘फिनिशिंग’वर काम करावं लागणार आहे. विराट, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि श्रेयस अय्यर हे देखील टी-20 संघात सामील झाले आहेत. अक्षर पटेलच्या जागी आलेला जडेजा फलंदाजीला अधिक बळ देईल. बुमराहच्या पुनरागमनामुळे गोलंदाजीलाही अधिक धार मिळेल.

ईशान बाहेर बसणार!

कोहली आणि इतर दिग्गज खेळाडूंना संघाच्या रोटेशन धोरणानुसार नियमित विश्रांती दिली जाते. त्यांच्या जागी दीपक हुडा यांना संधी देण्यात आली. हुडाचा फॉर्म पाहता त्याला संघातून बाहेर काढणं कठीण होणार आहे. तो कायम ठेवल्यास कोहलीला कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करावी लागेल. अशा परिस्थितीत ईशान किशनला बाहेर राहावे लागणार आहे. कोहलीनं डावाची सुरुवात करताना टी-20 मधील शेवटचे अर्धशतक झळकावलं.

एक महत्वाची माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराटनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतही ब्रेक मागितला आहे. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धचे आगामी दोन सामने या फॉरमॅटमधील त्यांचे भवितव्य लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विराटनं अनेकवेळा स्वत:ला सिद्ध केलं असलं तरी युवा खेळाडूंचा निडर खेळ पाहून त्याला पुन्हा आपल्या ओळखीच्या रंगात परतावं लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. पॉवरप्लेमध्ये 66 धावा झाल्या आणि विकेट पडल्यानंतरही धावा होत राहिल्या. भारताला मात्र ‘फिनिशिंग’वर काम करावे लागणार आहे.

इंग्लंड बदलू शकतो

यजमान इंग्लंडला पहिल्या सामन्यातील पराभव विसरून पुनरागमन करायला आवडेल. पहिल्या चेंडूवर बाद झालेला कर्णधार जोस बटलरकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. बटलरसह डेव्हिड मलान, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोन यांच्या उपस्थितीने संघाची फलंदाजी मजबूत दिसते. पण, पहिल्या सामन्यात सर्वांचीच निराशा झाली. गोलंदाजीतही सॅम कुरन, टायमल मिल्स, रीस टोपली किंवा मोईन अली हे फार महागात पडले. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

विराटनं गेल्या 15 सामन्यांमध्ये…

विराटनं मागच्या पंधरा सामन्यांमध्ये 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 55.77 च्या प्रभावी सरासरीनं आणि 134.58 च्या स्ट्राईक रेटनं एकूण 502 धावा केल्या आहेत. त्याने सहा अर्धशतकेही ठोकली आहेत. यामध्ये सर्वोच्च धावसंख्या 85 धावा आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड आमनेसामने

  1. एकूण सामने – 20
  2. भारत जिंकला – 11
  3. इंग्लंड विजयी – 9

भारत विरुद्ध इंग्लंड खेळपट्टी आणि हवामान

या आठवड्यात एजबॅस्टनच्या खेळपट्टीवर भारत विरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विक्रमी 378 धावा सहज गाठल्या होत्या. ही खेळपट्टी पूर्णपणे फलंदाजांना अनुकूल दिसते. मात्र, नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. सरासरी तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील आणि पावसाची शक्यता नाही.