Asian Games 2026: भारत-बांग्लादेश सेमीफायनल रद्द झाली तर फायनलला कोण? जाणून घ्या काय आहे नियम
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ आपला सेमीफायनल सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर कोणाला फायदा मिळेल? जाणून घ्या सविस्तर

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या क्रिकेट स्पर्धेत गतविजेता भारतीय महिला क्रिकेट संघ आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहोचला आहे. नागोया येथील कोरोबोगेई स्पोर्ट्स पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताने यजमान जपानचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के केले. आता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताचा सामना 20 सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीत बांगलादेशशी होणार आहे. सध्या नागोयामधील हवामान पाहता, जर पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला, तर कोणता संघ अंतिम फेरीत पोहोचेल? असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे.
मॅच रद्द झाली तर कोण पोहोचणार फायनलमध्ये?
स्पर्धेच्या नियमांनुसार, जर भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा बाद फेरीचा सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला, तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. जर सामना पूर्णपणे पावसामुळे रद्द झाला आणि डकवर्थ-लुईस नियमासाठी आवश्यक असलेली किमान षटकेसुद्धा खेळता आली नाहीत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उच्च रँकिंग आणि स्पर्धेतील उच्च सीडिंग असलेला संघ विजेता घोषित केला जातो. आंतरराष्ट्रीय टी20 रँकिंग आणि स्पर्धेच्या सीडिंगमध्ये भारतीय महिला संघ बांगलादेशपेक्षा खूप पुढे आहे, त्यामुळे सामना रद्द झाल्यास भारतीय संघाला याचा पूर्ण लाभ मिळेल.
बांगलादेशला याच नियमामुळे लागली होती लॉटरी
बांगलादेशच्या महिला संघाने याच नियमाचा फायदा घेत उपांत्य फेरी गाठली आहे. गुरुवारी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशचा सामना चीनशी होणार होता, परंतु सततच्या पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्यात आला. परिणामी, आपल्या श्रेष्ठ आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे बांगलादेशने थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता.
उपांत्यपूर्व सामन्यात भारताची जपानवर सहज मात
उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत जपानला पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जपानच्या संघाने पूर्ण 20 षटके खेळण्याचा प्रयत्न केला, पण धारदार भारतीय गोलंदाजीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. भारताने जपानला 19.5 षटकांत अवघ्या 57 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी अवघ्या 5 षटकांत 2 गडी गमावून 58 धावांचे सोपे लक्ष्य सहज पार केले.