Hardik Pandya: हार्दिक पांड्याला संघातून डच्चू? लखनौविरुद्ध न खेळण्याचं कारण आलं पुढे
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असताना दहाव्या सामन्यात हार्दिक पांड्याचं नाव प्लेइंग 11 मधून गायब होतं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. असं का ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. एकीकडे मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरू असताना हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव मैदानात येणं हे आश्चर्यकारक होतं. या सामन्यात हा खेळाडू का खेळत नाही? त्याला संघातून काढलं का? त्याचं कर्णधारपद काढून घेतलं का? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. त्याला कारणही तसंच आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पार वाट लागली आहे. त्यात हार्दिक पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. फलंदाजी-गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं सहाजिकच आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यान नसल्यांना चर्चांना उधाण आलं आहे.
हार्दिक पांड्या का खेळत नाही?
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने खेळत नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी याबाबत सांगितलं. त्याच्या कंबरेतील दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या पर्वात हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा सामना खेळला नाही. तेव्हाही सूर्यकुमार यादवने कर्णधारपद भूषवलं होतं. हार्दिक पांड्या संघात नसला तरी रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा पाच सामन्यात खेळला नव्हता. तसं पाहिलं तर या पर्वात हार्दिक पांड्याची निराशाजनक कामगिरी आहे. त्याने 8 सामन्यात 20.8 च्या सरासीरीने 146 धावा केल्या आहेत. तर फक्त चार विकेट काढल्या आहेत. इकोनॉमी रेटही प्रति षटक 11 पेक्षा जास्त आहे.
हार्दिक पांड्याचं कर्णधारपद संकटात?
हार्दिक पांड्याचं कर्णधारपद संकटात आलं आहे. हार्दिक पांड्या सलग तिसऱ्या पर्वात मुंबईचं कर्णधारपद भूषवत आहे. 2024 या पर्वात त्याने पहिल्यांदा कर्णधारपदाची धुरा हाती घेतली होती. या पर्वात त्याच्या नेतृत्वात संघाने सुमार कामगिरी केली. पण मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. पण यंदा पु्न्हा सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं कर्णधारपद संकटात आलं आहे.