BAN vs SL : दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका मजबूत स्थितीत, बांगलादेशवर सामना वाचवण्याची वेळ!

श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिला सामना ड्रॉ झाल्याने मालिका जिंकण्यासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने सामन्यात आघाडी घेतली आहे. त्यामुळे सामना श्रीलंकेच्या पारड्यात झुकलेला दिसत आहे.

BAN vs SL : दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका मजबूत स्थितीत, बांगलादेशवर सामना वाचवण्याची वेळ!
दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका मजबूत स्थितीत, बांगलादेशवर सामना वाचवण्याची वेळ!
Image Credit source: Sri Lanka Cricket Twitter
| Updated on: Jun 26, 2025 | 6:28 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेतील साखळी फेरीत श्रीलंका आणि बांग्लादेश हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने दुसऱ्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना जिंकेल तो संघ मालिका खिशात घालणार आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात बांगलादेशची तशी फलंदाजी झाली नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ 247 धावांवर तंबूत परतला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने दुसऱ्या दिवशी दमदार खेळी केली. दुसऱ्या दिवशी 78 षटक श्रीलंकेच्या वाटेला आली. यावेळी श्रीलंकेने 2 विकेट गमवून 290 धावा केल्या. यासह पहिल्या डावात 43 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी या धावांत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कारण श्रीलंकेच्या हाती आणखी 8 विकेट आहेत. तर पाथुम निस्संका 146 धावांसह मैदानात तग धरून आहे.

पाथुम निस्संका आणि लहिरू उदारा ही जोडी मैदानात उतरली होती. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 88 धावांची भागीदारी केली. लहिरू उदारा हा 40 धावा करून बाद झाला. त्यानंतर पाथुम निस्संका आणि दिनेश चंडिमल यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 194 धावांची भागीदारी केली. दिनेश चंडिमल 93 धावांवर असताना बाद झाला. त्याचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. शेवटची तीन षटकं शिल्लक असताना बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाथुम निस्संका नाबाद 146 आणि प्रबाथ जयसूर्या नाबाद 5 धावांवर खेळत आहे. श्रीलंकेकडे अजून 8 विकेट शिल्लक आहेत. जर पहिल्या डावात 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली तर हा सामना श्रीलंकेला सहज जिंकता येईल.

श्रीलंकेने दुसरा कसोटी सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर फरक दिसून येईल. श्रीलंकन संघ थेट दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. सध्या इंग्लंडने भारताला पहिल्या सामन्यात पराभूत केल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. पण श्रीलंकेने दुसरा सामना जिंकला तर विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के होईल. तर बांगलादेशची विजयी टक्केवारी ही 16.67 टक्के होईल. दरम्यान, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यांचा इम्पॅक्टही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर पडेल.

Follow Us