Kapil Dev: टीम इंडियाच्या पराभवावर कपिल देव हे काय बोलून गेले, म्हणाले….
Kapil Dev: माजी कर्णधार कपिल देव हे टीम इंडियाच्या कामगिरीवर नेहमीच परखडपणे भाष्य करतात.
नवी दिल्ली: माजी कर्णधार कपिल देव हे टीम इंडियाच्या कामगिरीवर नेहमीच परखडपणे भाष्य करतात. याआधी सुद्धा कपिल देव यांनी अनेक विषयांवर आपली स्पष्ट मत मांडली आहेत. आताही कपिलदेव यांनी टीम इंडियाच्या सेमीफायनलमधील पराभवावर मत मांडलं आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये काल टीम इंडियाचा पराभव झाला. इंग्लंडच्या टीमने तब्बल 10 विकेटने भारतावर विजय मिळवला.
हे चिंताजनक
“याच टीमने महत्त्वाच्या सीरीजमध्ये भारताला विजय मिळवून दिलाय. ते नेहमी आयसीसी टुर्नामेंटमध्ये अडखळतात, हे चिंताजनक आहे” असं कपिल देव म्हणाले.
हो, ते चोकर्स आहेत
“आता मॅच होऊन गेलीय. टीम इंडियावर आता बोचरी टीका करणं योग्य नाही. हो, ते चांगलं क्रिकेट खेळले नाहीत, त्यांच्यावर होणारी टीका योग्य आहे. आजच्या मॅचबद्दल बोलायच झाल्यास, इंग्लंडच्या टीमने पीचला चांगलं समजून घेतलं. ते चांगलं क्रिकेट खेळले. मी या खेळाडूंवर बोचरी टीका करणार नाही. कारण याच खेळाडूंनी आपल्याला आधी आदर मिळवून दिलाय. हो, ते चोकर्स आहेत, हे नाकारता येणार नाही. इतक्या जवळ जाऊन ते चोक करतात. टीमने आता पुढचा विचार केला पाहिजे. युवा खेळाडूंनी पुढे येऊन जबाबदारी घेतली पाहिजे” असं कपिल देव म्हणाले.
गोलंदाजांनी आधी चेंडू स्विंग केला आणि नंतर….
“आपले सर्व आकडे, अंदाज चुकले. इंग्लंडची टीम चांगलं टी 20 क्रिकेट खेळली. सेमीफायनलमध्ये असा मोठा विजय दुर्मिळ आहे. पण याचं सर्व श्रेय इंग्लिश टीमला जातं. सुरुवातीच्या टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चेंडू स्विंग केला. पण त्यानंतर चेंडू आऊटसाइड ऑफला टाकले. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 20 धावा झाल्यानंतर बॉलर्सची लय बिघडली” असं कपिल देव म्हणाले.
भुवनेश्वर कुमार खराब बॉलर नाही, पण….
“भुवनेश्वर कुमार खराब बॉलर आहे, असं मी म्हणणार नाही. पण त्याची लाईन अँड लेंग्थ यावेळी सरासरी होती. 170 ही बऱ्यापैकी धावसंख्या होती. तुमच्या बॉलर्सनी टार्गेटनुसार गोलंदाजी करायला पाहिजे होती. धीम्या सुरुवातीनंतर आपण चांगलं कमबॅक केलं होतं. पण आपली बॉलिंग पाहून आपण इंग्लंडला रोखू असं कुठेही वाटलं नाही” असं कपिल देव म्हणालेय.