Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ

Team India: टीम इंडियाचा खेळाडू उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हीडिओत या खेळाडूने हा सर्व किस्सा सांगितला आहे. पाहा तो कोण आहे?

Team India: टीम इंडियाचा खेळाडू पासपोर्ट आणि मोबाईल विसरला! पाहा व्हीडिओ
yashasvi jaiswal and riyan parag rr
Image Credit source: rr x account
| Updated on: Jul 03, 2024 | 4:05 PM

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता भारतात येण्यासाठी उत्सूक आहे. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी 4 जुलै रोजी पहाटे नवी दिल्लीत पोहचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर टीम इंडियाचे खेळाडू मुंबईत येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय खेळाडूंची नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत डबल डेकर (ओपन डेक) बसमधून विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. एका बाजूला क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया कधी मुंबईत येतेय, याची प्रतिक्षा आहे. तर दुसर्‍या बाजूला टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही झिंबाब्वेला पोहचली आहे. टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध टी 20 सीरिज खेळणार आहे. याआधी टीम इंडियाचा एक युवा खेळाडू हा आपला पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. याबाबतची माहिती त्या खेळाडूने दिली.

बीसीसीआयने टीम इंडियाच्या या युवा खेळाडूंचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या व्हीडिओत रियान परागने याबाबतची माहिती दिली आहे. रियान परागची टीम इंडियात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे रियान टीम इंडियासाठी खेळण्याच्या उत्साहात पासपोर्ट आणि मोबाईल विसरला. रियानने व्हीडिओत काय म्हटलंय जाणून घेऊयात.

रियान पराग काय म्हणाला?

“लहानपणापासून प्रवास करण्याचं स्वप्न होतं. आम्ही मॅच तर खेळतच असतो, पण त्यासह टीमसह प्रवास करणं, इंडियाची जर्सीसह जाणं हे भारी असतं. मी इतका उत्सूक होतो की पोसपोर्ट आणि मोबाईल विसरलो होतो, मी विसरलो नाही फक्त पासपोर्ट आणि मोबाईल दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं होतं. आता माझ्याकडे आहे”, असं रियानने म्हटलं.

उत्साहाच्या भरात गडबड

“टीममध्ये नवे चेहरे आहेत, पण माझ्यासाठी ते ओळखीचे आहेत. आम्ही एकत्र खेळलो आहोत. लहानपणापासून हे स्वप्न पाहत होतो, ते आज पूर्ण झालं, त्यामुळे आनंद जास्त आहे. जेव्हा पहिला सामना कोणत्याही ग्राउंडवर खेळेन, तो क्षण मला काय लक्षात राहिलं”, अशा शब्दात रियानने आपल्या भावना व्यक्त केल्या.