
आयसीसी टी20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup ) काल झालेला सेमीफायनलचा सामना इंग्लंडला बराच काळ झोपू देणार नाही. भारताने दिलेल्या 254 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा हातातोंडाशी आलेला विजय निसटला. अवघ्या 7 धावांनी तक्यांना पराभव पत्करावा लागला. 20 ओव्हरमध्ये इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 246 धावा केल्या. या पराभवामुळे फायनलमध्ये पोहोचून, वर्ल्डकप उचलण्याचं इंग्लंडचं स्वप्न धुळीस मिळालं आणि त्यांना स्पर्धेतून बाहेर पडाव लागलं. कालच्या विजयासह भारताने फायनलमध्ये धडक मारली असून आता 8 मार्च रोजी त्यांचा सामना न्युझीलंडशी होणार आहे. हा सामना जिंकून वर्लडकपची ट्रॉफी पुन्हा उटलण्यास भारतीय संघ उत्सुक असून, त्यांना रोखून न्युझीलंडचा नाव वर्ल्डकपवर कोरण्यास त्यांचा संघही कसून प्रयत्न करताना दिसेल. या सामन्याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या नजरा लागल्या आहेत.
सॅमसनची शानदार खेळी
दरम्यान कालच्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने संपूर्ण सामन्याचे विश्लेषण करत पराभवाची कारणंही सांगितलं. टीम इंडियाची बॅटिंग सुरू असताना संजू सॅमसनचा सोडलेला कॅच इंग्लंडला प्रचंड महागात पडल्याचे नमूद करत तीच मोठी चूक ठरल्याचं ब्रूकने कबूल केलं. एकदा जीवदान मिळाल्यानंतर संजू सॅमसनने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आणि 89 धावांची शानदार खेळी करत भारताला मोठा स्कोअर करून देण्यात मोलाचा वाटा बजावला. विजयानंतर त्यालाच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
भारताची फलंदाजी सुरू असतानाच 15 धावांवर जीवदान मिळालेल्या संजू सॅमसनने याचा पुरेपूर फायदा उचलला आणि अवघ्या 42 चेंडूत 7 षटकार 8 आठ चौकारांसह 89 धावा फटकावल्या. आणि भारताला सात बाद 253 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली, जी स्पर्धेच्या इतिहासातील नॉकआउट सामन्यातीव सर्वोच्च धावसंख्या आहे. तर भारताच्या 254 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, बेथेलच्या शतकानंतरही (105 धावा, 7 षटकार, 8 चौकार) इंग्लंडला सात गडी गमावून फक्त 246 धावाच करता आल्या आणि पराभव पत्करावा लागला.
England captain Harry Brook said “I made a big mistake by dropping Sanju Samson”. #INDvsENG pic.twitter.com/7Rt1Zs5VOa
— Rosesh (@roseshpoet) March 6, 2026
तीच माझी मोठी चूक ठरली
“पहिल्या डावात चेंडू थांबेल आणि अधिक फिरेल असे आम्हाला वाटले होते, पण चेंडू बॅटवर चांगला आला आणि भारताने चांगली फलंदाजी केली,” असे ब्रुकने सामन्यानंतर नमूद केलं. “संजू सॅमसनचा कॅच सोडून मी खूप मोठी चूक केली हे मी मान्य करतो. आम्ही क्षेत्ररक्षणात फारशी चांगली कामगिरी केली नाही. आम्ही चुका केल्या आणि भारतासारख्या संघाविरुद्ध खेलताना या चुका परवड नाहीत ” असं म्हणत ब्रूकने चुकीची कबुली दिली.
मात्र ब्रूकने बेथेलचं खूप कौतुकही केलं. “बेथेलचा खेळ खरोखरच अविश्वसनीय होता, तो खूप पैसे कमवणार आहे. त्याने पहिल्या चेंडूपासूनच धावा केल्या आणि तो काय करण्यास सक्षम आहे, हे जगाला दाखवू दिलं. आमची स्पर्धा चांगली झाली आणि आम्ही कसे खेळलो याचा आम्हाला अभिमान असायला हवा. आम्ही संपूर्ण सामन्यात चिकाटीने खेळलो, परंतु दुर्दैवाने, निकाल आमच्या मनासारखा गेला नाही,” असं ब्रूकने नूद केलं.