Sunil Gavaskar : आयपीएलमध्ये गोलंदाजांना न्याय मिळावा यासाठी सुनील गावस्कर यांनी उठवला आवाज, जे पटत नाही त्यावर रोखठोक मांडलं मत
Sunil Gavaskar : "काही वर्षांपूर्वी मी जेव्हा आयपीएल गवर्निंग काउंसिलचा सदस्य होतो. तेव्हा मी व्यक्तिगत पातळीवर आठही फ्रेंचायजींच्या कॅप्टन्सना पत्र लिहून विचारलेलं की, आयपीएलला अजून आपण उत्तम कसं बनवू शकतो. बहुतांश उत्तरांमध्ये काही मोठा सल्ला नव्हता"

“आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये आपण बऱ्याच सेंच्युरी पाहतोय. आयपीएलचे अजून जवळपास दोन आठवडे शिल्लक आहेत. प्लेऑफ सुद्धा बाकी आहे. मे च्या अखेरीस आयपीएलचा अंतिम सामना आहे. मात्र, त्याआधी आणखी काही शतकं पहायला मिळू शकतात. फलंदाजीला अनुकूल विकेट असल्याने बहुतांश फलंदाज शतकं झळकवताना दिसतात” असं सुनील गावस्कर म्हणाले. “पाटा विकेटमुळे चौकार, षटकारांचा पाऊस पडतोय. चौकार आपण समजू शकतो. पण काही षटकार असे आहेत, जे कॅच बनू शकले असते. काही मैदानं छोटी आहेत. त्यामुळे तिथे जास्त फोर-सिक्स पहायला मिळतायत. प्रेक्षक स्टेडियममध्ये मोठे फटके पहायला येतात” असं सुनील गावस्कर म्हणाले. काल जसा मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला. शेवटच्या चेंडू पर्यंत या सामन्यातील रोमांच टिकून होता. तसे सामने पहायला प्रेक्षक स्टेडियममध्ये येतात. 15-16 ओव्हरमध्ये संपणारी मॅच पाहण्यात प्रेक्षकांना उत्साह नसतो.
“इंग्लंडचा जोफ्रा आर्चर, दक्षिण आफ्रिकेचा कगिसो रबाडा हे वर्ल्ड क्लास गोलंदाज आहेत. त्यांनी पाटा विकेटवर, फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर सुद्धा या सीजनमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अशावेळी गोलंदाजाच्या चार ओव्हरच्या नियमाबाबत विचार करता येऊ शकतो. एखादा फलंदाज 20 ओव्हर फलंदाजी करु शकतो, तर मग एखाद्या बॉलरने चार ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या असतील तर इनाम म्हणून त्याला एक अतिरिक्त ओव्हर का देऊ नये?” असा सवाल सुनील गावस्कर यांनी विचारला.
तर या फॉर्मेटमध्ये जरा अजून संतुलन येईल
“असं झाल्यास टीम धावा वाचवण्याऐवजी विकेट घेण्याला प्राधान्य देईल. ज्या चेंडूवर विकेट मिळतो तो उत्तम डॉट बॉल मानला जातो. तीन गोलंदाजांनी तीन-तीन विकेट घेतले, त्यांना एक अतिरिक्त ओव्हर मिळाली तर या फॉर्मेटमध्ये जरा अजून संतुलन येईल. सध्या सगळ्या गोष्टी फलंदाजाच्या बाजूने आहेत. छोटी बाऊंड्री, बाऊन्सर या बाबत गोलंदाजांसाठी काही कठोर नियम आहेत. अशावेळी गोलंदाजांचा उत्साह वाढवण्यासाठी असे काही नवीन नियम आणल्यास सामन्याचा उत्साह, रोमांच आणखी वाढेल” असं गावस्कर म्हणाले.
नव्या नियमांची चाचपणी करता येऊ शकते
“सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सारख्या टुर्नामेंट्समध्ये नव्या नियमांची चाचपणी करता येऊ शकते. सध्या फलंदाजांना अनुकूल असलेल्या या फॉर्मेटमध्ये संतुलन आल्यास आयपीएल 2028 च्या सीजनमध्ये हे नियम लागू करता येऊ शकतात” असं गावस्कर बोलले.
