भारतासाठी फक्त एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-20 खेळणाऱ्या खेळाडूचा क्रिकेटला निरोप, विराटचा खास
भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या अनुभवी लेग-स्पिनर कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कानपूर सुपरस्टार्स आणि मेरठ मॅव्हरिक्स यांच्यातील यूपी टी-20 लीग सामन्यानंतर या 38 वर्षीय खेळाडूने हा निर्णय जाहीर केला.

Karn Sharma Retirement: भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या अनुभवी लेग-स्पिनर कर्ण शर्माने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कानपूर सुपरस्टार्स आणि मेरठ मॅव्हरिक्स यांच्यातील यूपी टी-20 लीग सामन्यानंतर या 38 वर्षीय खेळाडूने हा निर्णय जाहीर केला. त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना 25 ऑगस्ट रोजी लखनौ येथे होणार आहे. भारतासाठी त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ चार सामन्यांची असली तरी, देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याचा प्रवास मोठा आणि संस्मरणीय होता. कर्णने भारतासाठी एक कसोटी, दोन एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळून एकूण पाच बळी घेतले. त्याची देशांतर्गत कामगिरी प्रभावी होती, ज्यात त्याने प्रथम-श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये मिळून एकूण 551 बळी घेतले. निवृत्तीनंतर प्रशिक्षण आणि क्रिकेटमधील इतर जबाबदाऱ्या स्वीकारण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
निवृत्तीवर कर्ण म्हणाला की…
ईएसपीएनच्या वृत्तानुसार, आपल्या निवृत्तीची घोषणा करताना कर्ण म्हणाला, “मला आता निवृत्त व्हायचे आहे. मी माझे कुटुंब, बीसीसीआय, रेल्वे, यूपीसीए, आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशन, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि या संपूर्ण प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचा अत्यंत आभारी आहे. यानंतर, मी प्रशिक्षण आणि क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्यांसाठी उपलब्ध असेन.” विराटच्या नेतृत्त्वात त्याने पदार्पण केले होते.
कर्णने 2007-08 च्या देशांतर्गत हंगामात प्रथम-श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला तो अष्टपैलू म्हणून खेळला. त्याने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात शतक झळकावले. त्याच्या कारकिर्दीला खरी गती 2012-13 च्या रणजी ट्रॉफी हंगामात मिळाली. त्या हंगामात त्याने तीन सामन्यांमध्ये 19.04 च्या सरासरीने 21 बळी घेतले. या कामगिरीबद्दल त्याला बीसीसीआयचा सर्वोत्कृष्ट 25 वर्षांखालील क्रिकेटपटू पुरस्कारही मिळाला.
कर्णने 97 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 270 बळी घेतले. या काळात त्याने 14 वेळा पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. त्याने फलंदाजी करताना दोन शतके आणि 14 अर्धशतकांसह 2866 धावा देखील केल्या. तो 100 प्रथम-श्रेणी सामने पूर्ण करण्यापासून फक्त तीन सामने दूर आहे, पण आता त्याची कारकीर्द 97 सामन्यांवरच संपणार आहे. कर्णने 123 लिस्ट ए सामन्यांमध्ये 153 बळी आणि 191 टी-20 सामन्यांमध्ये 168 बळी घेतले आहेत.
