
Jemimah Rodrigues Century vs Australia: सध्या संपूर्ण भारतात एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे भारताची स्टार महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिग्ज… जेमिमाह रॉड्रिग्ज हिने गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून दिला. जेमिमाह रॉड्रिग्ज हीने केलेल्या शतकाच्या जोरावर वूमन्स टीम इंडियाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील फायनलमध्ये धडक दिली आहे. भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी 2005 आणि 2017 मध्ये जेतेपदाच्या लढती गमावल्यानंतर टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना कांगारूंनी 49.5 षटकांत 338 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 48.5 षटकांत 5 गडी गमावून 341 धावा करून सामना जिंकला. सलग 15 सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारला आहे. 2017 नंतर पहिल्यांदाच त्यांना कोणत्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
सर्वात रंजक गोष्ट म्हणजे, गेल्या वेळीही टीम इंडियानेच त्यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर हरमनप्रीतच्या शतकाने त्यांना उपांत्य फेरीत बाद केलं. आता, जेमिमाच्या शतकाने त्यांना परतण्यास भाग पाडलं आहे. आज सर्वत्र जेमिमाह हिचा बोलबाला आहे. पण गेले 12 – 18 महिने जेमिमाह हिच्यासाठी फार कठीण होते. संघातील तिचं स्थान निश्चित नव्हतं आणि तिच्या वडिलांवर गंभीर आरोप करण्यात आले होते.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मुंबईतील सर्वात जुन्या क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखान्याने जेमिमाहचे वडील इव्हान रॉड्रिग्ज यांच्यावर धार्मिक धर्मांतर कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांचे सदस्यत्व रद्द केलं. खार जिमखान्यातील काही सदस्यांनी वडील इवान क्लबच्या परिसराचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी करत असल्याचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
धार्मिक कार्यक्रमामुळे धर्मांतराला चालना मिळत होती… असे आरोप जेमिमाह हिच्या वडिलांवर करण्यात आहे. वडिलांवर झालेल्या आरोपांमुळे जेमिमाह हिला मोठा धक्का पोहोचला होता. पण तिने तिच्या ध्येयाकडे दुर्लक्ष केलं नाही. ती मेहनत करत राहिली. अखेर जेमिमाह हिने तिच्या कमाने फक्त तिच्या वडिलांचीच नाही तर, भारताची मान देखील उंचावली आहे.