M S Dhoni : महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

महेंद्रसिंह धोनीला कर्णधारपद सोडायला लावले, असा दावा केला जातोय. निवड समितीचा भाग असलेल्या परांजपे यांनी केलेल्या विधानांमुळे या चर्चांना उधाण आले आहे.

M S Dhoni : महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!
m s dhoni
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 14, 2026 | 3:07 PM

Mahendra Singh Dhoni Captaincy : भारतीय पुरुष क्रिकेट टीममध्ये असे काही खेळाडू होऊन गेले जे मैदानावर येताच धावांचा पाऊस पाडत. या खेळाडूंचे चाहतेही लाखोंमध्ये होते. यातील काही खेळाडू तर आजही तेवढेच लोकप्रिय आहेत.या खेळाडूंनी क्रिकेटमधून संन्यास घेतलेला असला तरीही त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अजूनही लोकांची तेवढीच गर्दी होते. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला महेंद्रसिंह धोनी हा अशाच काही खेळाडूंमध्ये शीर्षस्थानी आहे. सध्या तो भारतीय संघाकडून खेळत नाही. तो फक्त आयपीएलमध्ये क्रिकेट खेळताना दिसतो. परंतु त्याचे आजही लाखोंनी चाहते आहेत. आता याच महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाविषयी वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत. महेंद्रसिंह धोनीने स्वइच्छेने कर्णधारपद सोडले नव्हते. त्याला हे पद सोडण्यास भाग पाडले होते, असा खळबळजनक दावा केला जातोय.

महेंद्रसिंह धोनीने त्याचे कर्णधारपद कसे सोडले?

कधीकाळी भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचा भाग असलेले जतीन परांजपे नुकतेच ‘द ग्रेट इंडियन क्रिकेट शो’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात त्यांनी महेंद्रसिंह धोनीने त्याचे कर्णधारपद कसे सोडले? याबाबतचे काही खुलासे केले आहेत. इंग्लंडविरोधातील सामन्यांच्या अगोदर महेंद्रसिंह धोनीने 4 जानेवारी 2017 रोजी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट प्रकारातील संघाचे कर्णधारपद सोडले होते. महेंद्रसिंह धोनीने 2014 साली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील कर्णधार म्हणून चोख जबाबदारी पार पाडण्यावर लक्ष केंद्रित केले होते.

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

महेंद्रसिंह धोनीने 2015 सालाचा विश्वचषक आअि 2016 सालचा टी-20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर 2017 साली त्याने एकदिवसीय आणि टी-20 प्रकारातील भारतीय संघाचे कर्णधारपदही सोडले होते. याबातच परांजपे यांनी सविस्तर सांगितले आहे. धोनीला कर्णधारपद सोडण्यास सांगितले होते, असेच त्यांनी अप्रत्यक्षणे सांगितले आहे. “महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करत होता. त्याने साधारण तासभर फलंदाजी केली. आम्ही दोघे एकमेकांकडे बघत होतो. कर्णधारपदाबाबत त्याला सन्मानजनक पद्धतीने सांगायला हवे, असे आम्ही ठरवले होते. आम्ही धोनीजवळ गेलो आणि आता पुढे जाण्याची वेळ आली आहे, असे आम्हाला वाटत आहे, असा संदेश आम्ही धोनीला दिला,” अशी माहिती परांजपे यांनी दिली.

वेगवेगळ्या चर्चांना उधाण

त्यानंतर धोनीनेदेखील हा निर्णय योग्य आहे, असे सांगितले. त्यानंतर मी कर्णधारपद सोडणार आहे, असे तुला लिहून द्यावे लागेल, असे आम्ही धोनीला सांगितले. त्यानंतर रात्री धोनीचा एक मेल आला. त्यात मला कर्णधारपद सोडायचे आहे, असे लिहिलेले होते असे परांजपे यांनी सांगितले. दरम्यान, परांजपे यांच्या याच दाव्यामुळे धोनीला कर्णधारपद सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावा केला जातोय. वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

Follow Us