Hockey World Cup 2026: उपांत्य फेरी गाठण्याची मोठी संधी भारताने गमावली, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात काय झालं?
हॉकी वर्ल्डकप 2026 फेरीच्या क्रॉसओव्हर फेरीतील पूल ई मध्ये भारताचा सामना नेदरलँडशी झाला. या सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत विजय अपेक्षित होता. पण तसं झालं नाही.

Hockey World Cup 2026, India vs Netherland: हॉकी वर्ल्डकप 2026 उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी महत्त्वाचा सामना भारत आणि नेदरलँड यांच्यात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला काहीही करून विजय हवा होता. पण तसं झालं नाही. नेदरलँडकडून भारताचा 1-3 ने पराभव झाला. तसेच नेदरलँडने उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारताच उपांत्य फेरीचं गणित चुकलं आहे. पहिल्या क्वॉर्टरपासून नेदरलँडने आक्रमक सुरूवात केली. जास्तीत जास्त स्वत:च्या पारड्यात ठेवत आक्रमक चढाया केल्या. पण भारताने यावेळी चांगला डिफेंस केला आणि गोल होण्यापासून वाचवलं. त्यामुळे या 15 मिनिटांच्या खेळात 0-0 अशी स्थिती राहिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँडच्या खेळाडूंनी खेळाचा वेग वाढवला आणि आणखी आक्रमक सुरूवात केली.नेदरलँड्सने भारताच्या डी सर्कलमध्ये प्रवेश मिळवून पेनल्टी कॉर्नर मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, भारतीय गोलकीपर आणि डिफेंडर्सनी कमालीचा संयम दाखवत त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. त्यामुळे या क्वॉर्टरमध्येही 0-0 अशी गोलस्थिती राहिली.
दुसऱ्या हाफमध्ये भारतीय संघ पिछाडीवर
तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये नेदरलँड्सने अखेर गोल मारण्यात यश मिळवलं. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ 0-1 ने पिछाडीवर पडला. नेदरलँड्सच्या संघाने त्यांच्या आक्रमणाचा वेग कमालीचा वाढवला आणि जोरदार चढाया केल्या. इतकंच काय तर भारतीय डिफेंडर्सवर सतत दबाव आणण्यास सुरुवात केली. पण भारताची सुरक्षित भिंत अखेर नेदरलँड्सच्या डुको टेलगेनकेम्पने भेदली आणि मैदानी गोल मारला. एका गोलने गोलने पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा घेतला. भारताने चेंडूवर ताबा मिळवून नेदरलँडच्या गोलपोस्टवर काही चढाया केल्या, पण यश काही मिळालं नाही.
चौथ्या क्वॉर्टरमध्ये टीम इंडिया कमबॅक करेल असं वाटलं होतं. त्याचा उलट झालं आणि पहिल्या काही मिनिटातच नेदरलँडने गोल मारत भारताला 0-2 पाठी ढकललं. त्यानंतर शेवटची काही मिनिटं असताना टीम इंडियाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत सिंगने गोल मारत 1-2 अशी स्थिती आणली. पण नेदरलँडने पुन्हा जोरदार हल्ला चढवत 1-3 अशी स्थिती आणली. ही स्थिती शेवटपर्यंत राहिली आणि भारताचा उणे 2 गोलसह पराभव झाला.
भारताचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात!
हॉकी वर्ल्डकप 2026 मधील नेदरलँड्सविरुद्धचा सामना गमवल्यानंतर भारतीय संघाचे सेमीफायनलमध्येपोहोचणे अत्यंत कठीण आहे. जवळपास आव्हान संपुष्टात आलं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. आता अर्जेंटिनाविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. पण हे काही शक्य नाही. कारण क्रॉसओव्हर फेरी गाठण्यापूर्वीच भारत 2 गोलने पिछाडीवर होता. त्यात नेदरलँडचा सामना गमावल्याने ही स्थिती आणखी खालावली आहे. या सामन्यात आणखी दोन गोल पिछाडीवर आला आहे. त्यामुळे 4 गोल पिछाडीवर आहे.
