Maharashtra Kesari Final : फायनलमध्ये महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर आमनेसामने, कोण जिंकणार मानाची गदा?
Maharashtra Keasri Final Match : मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी या गदेचा मानकरी कोण होणार? याचा निकाल आता थोड्याच वेळात लागणार आहे. अंतिम सामन्यात महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

पुण्यातील वाघोली इथून क्रीडा वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम फेरीतील 2 कुस्तीपटू अखेर निश्चित झाले आहेत. 68 व्या महाराष्ट्र केसरी माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विजयी झाला आहे. महेंद्र गायकवाड याने हिंगोलीच्या सिकंदर शेख याच्यावर एकतर्फी विजय मिळवून फायनलमध्ये धडक दिली आहे. तर गादी विभागातून (मॅट) हर्षवर्धन सदगीर याने फायलनचं तिकीट मिळवलं आहे. हर्षवर्धनने जय पाटील याचा पराभव करुन ही कामगिरी केली आहे. त्यामुळे आता मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी या गदेसाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यात थरार रंगणार आहे. त्यामुळे या अंतिम सामन्याकडे कुस्ती चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
अंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
अंतिम सामन्यासाठी दोन्ही कुस्तीपटू निश्चित झाले आहेत. त्यामुळे या महाअंतिम सामन्याला किती वाजता सुरुवात होणार याची प्रतिक्षा उपस्थित चाहत्यांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र गायकवाड विरुद्ध हर्षवर्धन सदगीर यांच्यातील अंतिम सामन्याला 7 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणता पैलवान या मानाच्या गदेवर आपली मोहोर उमटवण्यात यशस्वी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मॅट आणि गादी विभागातील सामन्यात काय झालं?
माती विभागातून महेंद्र गायकवाड याने सिंकदर शेख विरुद्ध अंतिम फेरीतील सामन्यावर सुरुवातीपासून घट्ट पकड मिळवली होती. महेंद्रने पहिली फेरी 3-0 अशा एकतर्फी फरकाने आपल्या नावावर केली. सिंकदरनेही डावपेच टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र महेंद्रसमोर सिंकदरचं काही चाललं नाही. पहिल्या फेरीनंतर काही मिनिटांच्या खेळानंतर महेंद्रला विजयी घोषित करण्यात आलं. महेंद्रला विजयी घोषित करताच उपस्थित चाहत्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.
मॅटवरील सामन्यात काय घडलं?
माती विभागातील सामन्याच्या निकालानंतर अवघ्या काही मिनिटांनी मॅटवरील सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचाही अवघ्या काही मिनिटांत निकाल लागला. हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात अंतिम फेरासाठी चुरस होती. मात्र हर्षवर्धनसमोर जय अपयशी ठरला. अशाप्रकारे हर्षवर्धनने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. आता हर्षवर्धन सरस ठरणार की महेंद्र आस्मान दाखवणार? हे थोड्याच मिनिटांत स्पष्ट होईल.
