
T20 World Cup 2026 Prize Money: आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 (T20 World Cup 2026 ) अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून भारताने (India) इतिहास रचला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली असून तो पहिल्यांदाच घरच्या मैदानावर विश्वविजेता बनला आहे.
या मोठ्या विजयासह इतिहास रचणाऱ्या टीम इंडियाला केवळ ट्रॉफीच नव्हे तर बक्षीसाची मोठी रक्कमही मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) या स्पर्धेसाठी13.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 120 कोटी रुपयांचा रेकॉर्ड प्राईज पूल ठेवला होता, जो मागील आवृत्तीपेक्षा जवळजवळ 20 टक्के जास्त आहे.
भारताला कोट्यवधींचं बक्षीस
टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाला 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजे अंदाजे 27.5 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली जाईल आणि नंतर बोनस, सामना शुल्क आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात खेळाडूंमध्ये ती वाटली जाईल.
न्युझीलंडलाही मोठं बक्षीस
कालचा अंतिम सामना हरला असला तरी, न्यूझीलंडच्या संघालाही मोठ्या प्रमाणात बक्षीसाची रक्कम मिळाली. उपविजेते म्हणून, न्यूझीलंडला 1.6 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 14.7 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले.
सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या टीम्सची कमाई
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनाही मोठ्या प्रमाणात बक्षिसं देण्यात आली. दोन्ही संघांना अंदाजे 7.24 कोटी रुपये बक्षीस देण्यात आले.
सुपर-८ मध्ये गाठणाऱ्या संघांसाठी बक्षिसं
स्पर्धेच्या सुपर ८ टप्प्यात पोहोचलेल्या संघांनाही भरीव बक्षिसे मिळाली. झिम्बाब्वे, पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांना अंदाजे 3.48 कोटी रुपये बक्षिसे देण्यात आली.
गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघांनाही मिळणार रक्कम
सर्व 20 संघांना प्रोत्साहन देण्यासाठी, आयसीसीने गट टप्प्यातून बाहेर पडलेल्या संघांना बक्षीस देखील दिले. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, आयर्लंड, इटली, नामिबिया, नेपाळ, नेदरलँड्स, ओमान, स्कॉटलंड, युएई आणि युनायटेड स्टेट्स यांना अंदाजे 2.3 कोटी रुपये मिळाले.
संजू सॅमसन प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा, भारतीय फलंदाज संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात 46 चेंडूत 89 धावा करत त्याने टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.