धनंजय मुंडेंना कोण वाचवतंय? अंजली दमानिया यांचा थेट आरोप काय?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडे यांच्या विरोधात एवढे पुरावे दिले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजानीम्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा आरोपही केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघं मिळून मुंडेंना वाचवत आहेत. एवढे सर्व घोटाळे दाखवूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही, कागदपत्रे देऊनही कारवाई होत नाही याचा अर्थ मुंडेंच्या मागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही आहेत असा होतो, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी सूरज चव्हाण यांच्या टीकेवर उत्तर देण्यास नकार दिला. नाही. मला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. कारण हे फार विद्वान लोक आहेत. त्यांनी एक एक विद्वान लोकांना माझ्यावर बोलायला आणि टिप्पणी करायला पाठवले आहे. मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, असं दमानिया म्हणाल्या.

