Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमधील रस्त्यांच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना कामे दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तसेच मनसेची सत्ता असताना नाशिक सुंदर होते, मात्र आपण केलेल्या कामांकडेही सध्याचे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे.
नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमधील रस्त्यांच्या कामांसाठी गुजरातमधील कंत्राटदारांना कामे दिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तसेच मनसेची सत्ता असताना नाशिक सुंदर होते, मात्र आपण केलेल्या कामांकडेही सध्याचे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी राज ठाकरेंना थेट आव्हान दिले आहे.
गिरीश महाजन यांनी सवाल केला की, “तुम्ही नाशिक एवढं सुंदर केलं होतं, तर मग तुमचा एक तरी नगरसेवक का निवडून आला नाही? सर्वच्या सर्व कसे पडले?” नाशिककरांनी मनसेची सत्ता आणि त्यांचा महापौर पाहिला. मात्र कार्यकाळ संपल्यानंतर एकही नगरसेवक निवडून आला नाही, यावरून जनतेने त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले असल्याचा टोला महाजन यांनी लगावला.
नाशिकमधील विकासकामांबाबत बोलताना महाजन यांनी सांगितले की, शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर पुढील 30 ते 40 वर्षे खड्डे पडणार नाहीत, याची काळजी घेतली जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार असल्याचे आधीच सांगण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी गुजरातमधील कंत्राटदारांना नाशिकची कामे दिल्याचा आरोप केल्यावर महाजन यांनी हा दावा फेटाळून लावला. “राज ठाकरेंचा काही तरी गैरसमज झाला आहे. मी त्यांना कामांची यादी देतो,” असे म्हणत त्यांनी थेट आव्हान दिले. नाशिक शहरात सुमारे 1,500 कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, या कामांचे कंत्राटदार कोण आहेत, याची यादी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
आऊटर रिंगरोड, घाटातील कामे आणि शहरातील इतर विकासकामांचीही यादी देऊ, असे महाजन यांनी सांगितले. त्यामध्ये बाहेरील राज्यातील किंवा गुजरातमधील कंत्राटदार नेमके कोण आहेत, हे राज ठाकरे यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी केले. ऑनलाइन टेंडर प्रक्रियेत कोणालाही निविदा भरता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिकमध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याच्या राज ठाकरे यांच्या आरोपांवरही गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. महापालिकेची कामे 20 ते 22 टक्के बिलोमध्ये, तर दुरुस्तीची कामे सुमारे 30 टक्के बिलोमध्ये देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. फायबर केबलची कामेही 42 टक्के बिलोमध्ये देण्यात आल्याचा दावा करत, “मग भ्रष्टाचार कसा असेल? कशासाठी राजकीय विधानं करता?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नाशिकमधील टेंडर प्रक्रियेत कोणतीही गफलत झालेली नसल्याचे सांगत महाजन यांनी या कामांसाठी IITची नियुक्ती करण्यात आल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे विनाकारण गंभीर आरोप करू नयेत, असे आवाहन करत त्यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, नाशिकमधील खड्डे, कंत्राटदार आणि विकासकामांवरून राज ठाकरे आणि गिरीश महाजन यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे नाशिकच्या राजकारणात वातावरण चांगलेच तापले आहे.
