तरारून आलेलं पांढरं सोनं डोळ्यादेखत वाहून गेलं, कर्जाच्या चिंतेनं आणखी एका शेतकऱ्याचा बळी, शिदोळ गाव सुन्न

| Updated on: Sep 20, 2021 | 4:25 PM

सोनवणे यांनी शेतासाठी सोसायटीचे 52 हजार तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एक लाख व इतर दोन लाख कर्ज घेतले होते. आता हातचे पीक वाहून गेल्यामुळे कर्ज कसे फेडणार आणि घरचा प्रपंच कसा चालवायचा, याच चिंतेने त्यांना ग्रासले होते.

तरारून आलेलं पांढरं सोनं डोळ्यादेखत वाहून गेलं, कर्जाच्या चिंतेनं आणखी एका शेतकऱ्याचा बळी, शिदोळ गाव सुन्न
सोयगाव तालुक्यातील शिदोंड गावात भगवान सोनवणे या शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
Follow us on

औरंगाबाद: सततची नापिकी अन् गेल्या 20-25 दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसानं (Heavy Rainfall in Marathwada) कपाशीचं पिक वाया गेलं, आता पिकासाठी घेतलेलं कर्ज कसं फेडणार या चिंतेनं ग्रासलेल्या शेतकऱ्याने शेतातच गळफास लावून घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे. सोयगाव तालुक्यातील शिदोळ (Shidol in Soygaon) गावात रविवारी 19 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. ऐन गणपती विसर्जनाच्या दिवशी शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे संपूर्ण गावावर काल शोककळा पसरली होती.

यंदा कपाशी चांगले दिवस दाखवण्याची होती आशा…

सोयगाव येथील वरठाणचे पत्रकार भावराव मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान भिवा सोनवणे( वय 60 रा. शिदोंळ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
मृत भगवान सोनवणे यांची शेती कीन्ही शिवारात गट नं.141 मध्ये चार एकर शेती होती.
या वर्षी शेतात कपाशीची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीपासून पावसाने चांगली सुरुवात असल्याने कपाशी पिकं जोमात होती. ह्यावर्षी मोठ्या प्रमाणावर उत्पादन येणार, अशी आशा या शेतकऱ्याला होती. परंतु गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून ढगफुटी तसेच मुसळधार पावसाने हा परीसर झोडपून काढला. एकसारखा पाऊस असल्याने होत्याचे नव्हते करुन टाकले आणि पावसामुळे कपाशी पिक वाया गेले.

दोन-अडीच लाख कर्ज फेडण्याचा जीवाला घोर

संपूर्ण कपाशी पिक वाहून गेल्याने भगवान सोनवणे अत्यंत चिंताग्रस्त होते. शेतीसाठी लागलेला खर्च निघणेही कठीण होते. सोनवणे यांनी शेतासाठी सोसायटीचे 52 हजार तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एक लाख व इतर दोन लाख कर्ज घेतले होते. आता हातचे पीक वाहून गेल्यामुळे कर्ज कसे फेडणार आणि घरचा प्रपंच कसा चालवायचा, याच चिंतेने त्यांना ग्रासले होते. अखेर रविवारी सकाळी शेतात जातो असे सांगून ते निघाले आणि शेतातील झाडाला गळफास घेतला. काही वेळाने पुतण्या बापु सोनवणे हा शेतात आल्यावर प्रथम त्याने हे पाहिले आणि कुटुंबियांना ही माहिती दिली.

बनोटी येथे उत्तरीय तपासणी

दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून भगवान सोनवणे यांची उत्तरीय तपासणी बनोटी आरोग्य केंद्रात केली. संध्याकाळी सात वाजता येथील स्मशानभूमीत अत्यंसस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,सुना, नातवंडे असा परिवार आहे.

सप्टेंबरमधील पावसानं मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत

औरंगाबादसह जालना, परभणी, हिंगोली परिसरातील ग्रामीण भागाला सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पावसाचा जोरदार फटका बसला. मराठवाड्यात झालेल्या या ढगफुटीमुळे असंख्य शेतकऱ्यांची हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत नाहीशी झाली. अनेक शिवारात पाणी साठून राहिल्याने पिकांची नासाडी झाली. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळांची पाहणी करून पिकविम्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ दावे करण्याचे आदेशही दिले होते. मात्र या संपूर्ण प्रक्रियेचा लाभ कधी मिळणार, कर्जाचे हफ्ते कसे फेडणार व कुटुंबाची गुजराण कशी करणार अशा असंख्य चिंता या भागातील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत. (60 year old farmer hanged himself in Soygaon, Aurangabad District)

इतर बातम्या

ई-पीक पाहणी : मोबाईलवर केलेली नोंद सातबाऱ्यावरही येणार, 30 सप्टेंबरपर्यंतच मुदत

सरकारचा निर्णय बायोडिझेलबाबतचा अन् फायदा होणार शेतकऱ्यांना