Crop Insurance : बोगस पीक विम्याचा ‘आका’ कोण? कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा गौप्यस्फोट, राज्यात इतके लाख अर्ज बाद, सीएसएस सेंटर रडारवर
Manikrao Kokate on Bogus Crop Loan : राज्यात बोगस पीक विम्याचा बीड पॅटर्न गाजत आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाने खळबळ उडवलेली असतावाच नुकतेच कृषीमंत्र्यांनी हा घोटाळा कुणी आणि का केला याविषयी मोठं भाष्य केले आहे.

राज्याचं नाही तर बीड हे देशाच्या केंद्रस्थानी आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्याच नाही, तर अनेक घोटाळ्याच्या अग्रस्थानी बीड पॅटर्न असल्याचे समोर आले आहे. पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर घोटाळा, अक्षय ऊर्जा कंपन्यांकडून खंडणी, बिंदूनामावली धाब्यावर बसवणे असे अनेक पॅटर्न बीडला बदनाम करत आहेत. त्यातच 1 रूपया पीक विम्यातील बोगसगिरी समोर आल्यानंतर खळबळ उडली आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाने खळबळ उडवलेली असतावाच नुकतेच कृषीमंत्र्यांनी हा घोटाळा कुणी आणि का केला याविषयी मोठं भाष्य केले आहे.
पीक विम्याचा बोगस उद्योग
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्याचा बोगस उद्योगच सर्वांसमोर आणला. त्यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण आदेश दिले आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून आता बोगस पीक विम्याच्या सुरस कथा समोर येतील. काही ठिकाणी पिक विम्यात गैरव्यव्हार झालेत, अशी कबुली कृषीमंत्र्यांनी दिली. राज्या बाहेरीलही काही लोकांनी अर्ज दाखल केले आहेत. मशिद; मंदीर; मोकळ्या जागा या शेतजमिनी दाखवले गेल्याचे प्रकार समोर आल्याची माहिती त्यांनी दिली.




4 लाखांहून अधिक पीक विमा अर्ज बाद
राज्यात 4 लाखांहून अधिक पीक विमा अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. योजनेत काही आमुलाग्र बदल केले जातील. युनिक आयडी कार्ड शेतकऱ्यांना दिले जातील. ते आधार कार्डशी लिंक केले जातील असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचा अपडेट डेटा जमा करण्यात येत आहे. केवळ बीड मध्येच गैरव्यव्हार नाही. मंत्र्यांनी हे गैरव्यवहार केले असे नाही. धनंजय मुंडेंवर होणारे आरोप राजकीय असल्याचे ते म्हणाले. अनेक अर्ज रद्द केले, त्या खात्यात पैसे वर्ग केलेले नाही. शासनाचा पैसा वाचवल्याचे ते म्हणाले.
बोगस पीक विम्याचा आका कोण?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सीएससी सेंटरवर या बोगस पीक विम्याचे खापर फोडले आहे. सीएससी केंद्रांना एका अर्जामागे 40 रुपये मानधन मिळते. त्यापोटीच त्यांनी असे बोगस अर्ज भरल्याचे सूतोवाच त्यांनी केले. हे उद्योग या मानधनासाठी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. 96 सीएससी सेंटरवर कारवाईचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. या गैरव्यवहारसाठी शेतकऱ्यांना पूर्णपणे दोषी धरता येणार नाही, असे ते म्हणाले. गैरव्यवहार झाला म्हणून ही योजनाच बंद करायची या विचाराचा मी नाही, असे ते म्हणाले. तर योजनेतील त्रुटी दूर करण्यात येईल असे ते म्हणाले.