Farmer Loan Waiver: कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करावा लागणार? अखेर तो संभ्रम दूर झाला… शेतकऱ्यांना सरकारचा काय दिलासा? मोठी अपडेट काय?
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्याविषयीची मोठी अपडेट समोर आली आहे. 56 लाख शेतकऱ्यांची बँक कर्ज खाती निरंक होणार आहे.

Farmer Debt Relief Scheme: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार आहे. या योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांनी कर्जखात्याची तपासणी आणि माहिती अपलोड करण्याचे काम झटपट उरकले आहेत. संपूर्ण राज्यात जेव्हा हे काम पूर्ण होईल, त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल.
ॲग्रीस्टॅक नोंदणीशिवाय लाभ नाही
कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणीशिवाय पर्याय नाही. तर त्यांना आधार प्रमाणीकरण, पडताळा ही करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नसेल, त्यांनी ती त्वरीत करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडे ही नोंदणी करता येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने 36 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
स्वतंत्र अर्ज करण्याची नाही गरज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनाचा लाभ घेण्यासाठी बँका आणि सहकारी संस्थांकडून कर्ज खात्याची माहिती थेट शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. अनेक जिल्ह्यात हे काम पूर्ण होत आले आहे. तर काही जिल्ह्यात हे काम अद्याप बाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधारकार्ड प्रमाणीकरणा आधारे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
दोन लाखांचे कर्ज होणार माफ
2 जून 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने कर्जमाफी योजनेला मंजूरी दिली होती. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट करण्यात येईल. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. महायुती सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे. सरकारने व्यापारी व संबंधिक बँकांना योजनेतंर्गत निर्देश दिले आहे. थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र ठरतील.
आमदार रोहित पवारांचा एल्गार
सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग केले होते. पण राज्य सरकारने शिष्टाई केल्याने त्यांनी आंदोलन मागे घेतले. पण सरकारच्या हेतूवर त्यांनी शंका व्यक्त करत आता 30 जूनपासून एल्गार मोर्चाचा इशारा दिला आहे. सरकारच्या कर्जमाफी योजनेत 70 टक्के शेतकरी वंचित राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने कर्जमाफी योजनेतील सुधारणा, निकष बदलासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन केला आहे.
