
PM Kisan Samman Nidhi : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत केली जाते. केंद्र सरकारतर्फे ही योजना राबवली जाते. केंद्र सरकार एका वर्षात 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना ही मदत करते. प्रत्येक हप्त्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवले जातात. आता लवकरच देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण यावेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 नव्हे तर तब्बल 4000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे नेमके कसे मिळणार आहेत? तसेच चार हजार रुपयांची मदत मिळण्यास कोणते शेतकरी पात्र आहेत, हे जाणून घेऊ या…
याआधी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये पाठवण्यात आले होते. हा शेतकऱ्यांना मिळालेला 21 वा हप्ता होता. त्यानंतर आता फेब्रुवारी महिना सुरू झालेला असला तरीही शेतकऱ्यांना अजूनही 22 वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे या हप्त्याची शेतकरी वाट पाहात आहेत. असे असताना आता मोठी माहिती मिळत आहे. देशातील अनेक शेतकऱ्यांना यावेळी 2000 रुपयांऐवजी थेट 4000 रुपये मिळणार आहे. याआधीचा ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. तसेच अर्जामध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांना 21 वा हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे यावेळी ज्या शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटी दूर केलेली आहे, तसेच ज्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्या शेतकऱ्यांना थेट 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार यावर्षी होळी सणाच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 22 वा हप्ता पाठवला जाणार आहे. म्हणजेच 4 मार्च 2026 च्या अगोदरच शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये मिळू शकतात. तसं पाहायचं झालं तर अद्याप सरकारने 22 वा हप्ता कधी मिळणार, याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. तत्पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अजूनही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी केलेली नाही, त्यांनी ती प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.