सुवर्ण बाजाराला मोठा झटका… चार दिवसात जे काही घडलं त्याने व्यापाऱ्यांचं वाढलं टेन्शन; सोने खरेदी तब्बल…

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सुवर्ण बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांत सोने खरेदीत तब्बल ५०% घट झाली असून व्यापाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. यामुळे ७० हजार नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती असून सराफ व्यावसायिक चिंतेत आहेत. स्मगलिंग वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सुवर्ण बाजाराला मोठा झटका... चार दिवसात जे काही घडलं त्याने व्यापाऱ्यांचं वाढलं टेन्शन; सोने खरेदी तब्बल...
Gold Market
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 14, 2026 | 7:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी सर्वांना वर्षभर सोनं न खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे बाजारात एकच खळबळ उडाली आहे. देशातील असंख्य नागरिकांनी सोनं खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे सुवर्ण बाजाराचे तीन तेरा वाजले आहेत. गेल्या चार दिवसात सुवर्ण बाजारात सोने खरेदीत तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. तर कारागिरांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तर सोनं खरेदी घटल्याने सराफा व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत.

राज्य व्यापारी आणि उद्योग महासंघाचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोन्याच्या कारागीर, व्यापारी यांच्यावर संकट आले आहे. मोदींच्या आवाहनानंतर राज्यात सोने खरेदी 50 टक्के घटली आहे. सोन्यावर आयात शुल्क वाढवल्यान सोने खरेदी कमी होईल असे नाही, ज्यांना आवश्यक आहेत ते सोने खरेदी करणारच. उलट सोन्याची स्मगलिंग होण्याची शक्यता जास्त आहे, असं दीपेन अग्रवाल म्हणाले.

70 हजार लोकांची नोकरी जाणार

तीन दिवसांत सोन्याच्या खरेदीत 50 टक्क्यांची घसरण आली आहे. माझ्या पत्नीलाही सोने खरेदी करायची होती. मात्र आता आम्ही ते स्थगित केलंय. युद्ध आणि जागतिक परिस्थिती वेगळी आहे. महागाई वाढणार आहे. डीझेल, पेट्रोल, एलपीजी भारत आयात करतो. पण आता ते मिळणं कठिण होऊन बसलंय. याचा खूप दूरगामी परिणाम पडण्याची शक्यता आहे. कच्चे तेल 160 रुपये प्रति डॉलरवर पोहचले आहे. पुढील 8 ते 10 महिन्यात ट्रेड इंडस्ट्री 1 ते दीड लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. राज्यात विविध उद्योगातील 60 ते 70 हजार लोकांचे रोजगार जाण्याची शक्यता आहे, अशी भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली.

गर्दी कमी झाली

तर मलाबार गोल्ड आणि डायमंड शोरूमचे व्यवस्थापक दिनेश टेमकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोनं चांदी खरेदी न करण्याच्या आवाहनाचा जळगावच्या सराफ बाजारावर परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे. जळगावच्या सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मलाबार गोल्ड शोरुममध्ये ग्राहकांचा शुकशुकाट पसरला आहे. मोदींच्या आवाहनानंतर गर्दी कमी झाली आहे, असं टेमकर म्हणाले.

लग्नासाठी खरेदी करणाऱ्या ग्राहकांव्यतिरिक्त नियमित खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. नुकसानीला सामोरे जाणार असलो तरी मात्र नरेंद्र मोदी यांनी देशासाठी घेतलेला निर्णय असल्याने त्याला पाठिंबा असल्याचे देखील शोरूमच्या व्यवस्थापकांनी म्हटलं आहे.

निर्णय बदल करून घेता आला असता

मोदी यांनी नागरिकांना वर्षभर सोने चांदीचे खरेदी न करण्याच्या केलेल आवाहन मोठा नुकसानकारक असल्याचे जळगावच्या ग्रामीण भागातील सराफ व्यवसायिकांनी म्हटलं आहे. नागरिकांनी वर्षभर सोने चांदीची खरेदी थांबवली तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागातील सराफ व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. मोदींनी घेतलेला निर्णय देशासाठी खरोखर चांगला आहे, मात्र हे आवाहन करताना मोदींनी सराफ व्यावसायिक आणि यावर अवलंबून कामगारांचा विचार करायला हवा होता. हा मोठा नुकसानकारक असा निर्णय असून यात आणखी बदल करून निर्णय घेता आला असता, अशी अपेक्षा देखील सराफ व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे.

Follow Us