Sri Lanka financial crisis : भारताकडून डिझेलनंतर आता श्रीलंकेला 40,000 टन पेट्रोलचा पुरवठा

| Updated on: May 24, 2022 | 7:31 AM

भारताने काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेला डिझेलचा पुरवठा केला होता. आता डिझेलनंतर श्रीलंकेला 40,000 टन पेट्रोल देखील पाठवण्यात आले आहे.

Sri Lanka financial crisis : भारताकडून डिझेलनंतर आता श्रीलंकेला 40,000 टन पेट्रोलचा पुरवठा
Follow us on

नवी दिल्ली : कर्ज सुवविधेंतर्गत भारताने श्रीलंकेला 40,000 टन डिझेलचा (Diesel) पुरवठा केला होता. त्यानंतर काहीच दिवसांमध्ये आता भारताकडून श्रीलंकेला (Srilanka) 40,000 टन पेट्रोलचा पुरवठा करण्यात आला आहे. श्रीलंका सध्या आर्थिक संकटात (Economic Crisis) सापडली आहे. द्विपक्षीय करारांतर्गत श्रीलंकेला आर्थिक संकटात मदत मिळावी यासाठी भारताने श्रीलंकेला सुरुवातीला डिझेल आणि आता पेट्रोलचा पुरवठा केला आहे. एवढेच नाही तर भारताने गेल्या महिन्यात इंधनाच्या आयातीसाठी श्रीलंकेला 50 कोटी डॉलरचे अतिरिक्त कर्ज देखील दिले होते. श्रीलंकेचा परदेशी चलनसाठा झपाट्याने कमी झाल्याने, श्रीलंकेला इतर देशातील वस्तु आयात करताना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेला 40,000 टन पेट्रोल पाठवल्याची माहिती भारतीय उच्चायोगाकडून ट्विट करत देण्यात आली आहे. श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर आतापर्यंत श्रीलंकेला भारताने मोठ्याप्रमाणात मदत केली आहे.

श्रीलंकेत इंधन संकट भीषण

श्रीलंकेत पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. पेट्रोल, डिझेलसाठी नागरिकांना लांबचलांब रागा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोलच्या रांगेत वृद्धांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. दरम्यान आता देशात निर्माण झालेला पेट्रोल, डिझेलचा तुटवडा लक्षात घेता, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयात फारशी गरज नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल, डिझेलची बचत व्हावी यासाठी श्रीलंकेच्या संसदभवन परिसरातीलच हॉटेलमध्ये खासदारांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.

भारत यूरियाचा पुरवठा करणार

सध्या श्रीलंकेत आर्थिक संकट गंभीर बनले आहे. श्रीलंकेकडे पुरेशा प्रमाणात परकीय गंगजळी नसल्याने त्यांना आयात करण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याचा फटका त्यांना येत्या खरीप हंगामात देखील बसू शकतो. खतांची आयात वेळत न झाल्यास धान्याच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. हेच लक्षात घेऊन आता भारताकडून लवकरच श्रीलंकेला 65 हजार मॅट्रिक टन यूरियाचा देखील पुरवठा करण्यात येणार आहे. ज्यामुळे श्रीलंकेतील खताचा तुटवडा काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

सर्वात मोठे आर्थिक संकट

श्रीलंका सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. श्रीलंकेत महागाई उच्चास्थरावर पोहोचली आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र अशाही स्थितीत तेथील सरकार या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. खरीप हंगामात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात आली आहेत.