भाजीपाला की सोने-चांदी? महागाईत वाढ कशामुळे? RBI ने सांगितले कारण
Inflation : महागाई वाढीवर रिझर्व्ह बँकेने एक अहवाल सादर केला आहे. आरबीआयच्या मते, भाज्या किंवा इतर अन्नपदार्थांपेक्षा सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे महागाईवर दबाव वाढला आहे.

भारतात जेव्हा महागाई वाढण्याची बातमी येता सर्वांचे लक्ष भाजीपाला आणि दररोजच्या वापरातील वस्तूंच्या किंमतीची चर्चा होत असते. यात टोमॅटो, कांदे, बटाटे आणि डाळींच्या किमती सर्वात आधी लक्ष वेधतात. मात्र आता महागाई वाढीवर रिझर्व्ह बँकेने एक अहवाल सादर केला आहे. आरबीआयच्या मते, भाज्या किंवा इतर अन्नपदार्थांपेक्षा सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे महागाईवर दबाव वाढला आहे. फेब्रुवारीच्या पतधोरण बैठकीत आरबीआयने सांगितले की, दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात असताना सोने आणि चांदीच्या वाढणाऱ्या किमती महागाईच्या आकडेवारीवर परिणाम करत आहेत.
अन्नधान्याच्या किमती
आरबीआयने महागाईबाबत बोलताना म्हटले की, ‘सध्याच्या परिस्थितीत अन्नधान्य महागाई ही चिंतेची बाब नाही. देशात खरीप पीक चांगले आले आहे, तसेच सरकारकडे पुरेसा धान्य साठा आहे, त्यामुळे महागाईवरचा ताण कमी झालेला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत डाळी, तांदूळ, गहू आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांनी चिंता करण्याची गरज नाही. टोमॅटो आणि कांदे यांसारख्या भाज्यांच्या किमती अचानक वाढू शकतात, मात्र त्याचा महागाईवर फारसा परिणाम होणार नाही.
महागाईवर दबाव का वाढला आहे?
आरबीआयच्या अहवालात कोअर इन्फ्लेशन हे चिंतेचे कारण असल्याचे सांगण्यात आले आहे, याचा अर्थ अन्न आणि इंधन वगळता इतर वस्तूंमुळे महागाईवर दबाव आहे. आरबीआयच्या मते जर सोने वगळले तर डिसेंबरमध्ये कोअर इन्फ्लेशन सुमारे 2.6 टक्क्यांवर राहिले, ही एक सुरक्षित पातळी आहे. मात्र यात सोने आणि चांदीचा समावेश केला जातो तेव्हा आकडेवारीत बदल होतो. या मौल्यवान धातूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत, यामुळे ग्राहक किंमत निर्देशांकावर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.
सोने आणि चांदीचे अधिक महाग का होत आहेत?
गेल्या वर्षभरात जगभरात सोन्याच्या किमतीत वाढ झालेली आहे. युद्ध, भू-राजकीय तणाव, आर्थिक मंदीची भीती आणि जागतिक बाजारातील चढ-उतार यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात आहेत, त्यामुळे लोकांनी सोने आणि चांदीत मोठी गुंतवणूक केली आहे. कमकुवत डॉलर, भविष्यात कमी व्याजदरांची अपेक्षा आणि आर्थिक जोखमीची भीती यामुळे या दोन्ही धातूंची मागणी वाढली आहे. याच कारणामुळे देशांतर्गत बाजारातही सोने-चांदीच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. यामुळे महागाईवरही दबाव आला आहे.
