Dombivali Kidnapping : एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाचे अपहरण, चार आरोपींना अटक

| Updated on: Aug 05, 2022 | 7:33 PM

मानपाडा पोलिसांनी आठ तासाच्या आत गावकऱ्यांच्या वेशात सापळा रचत मुंबई- आगरा रोडवरील गोठेघर परिसरातून फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक करत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली.

Dombivali Kidnapping : एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाचे अपहरण, चार आरोपींना अटक
एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाचे अपहरण
Image Credit source: TV9
Follow us on

डोंबिवली : डोंबिवली पूर्वेत एका प्लायवुड विक्रेत्याच्या दुकानात ग्राहक बनून तीन लाखाचे प्लायवुडची ऑर्डर देत पैसे एटीएममधून काढून देत असल्याचे सांगत व्यावसायिकाला सोबत नेले. त्यानंतर भर रस्त्यातून व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping) करून जीवे ठार मारण्याची धमकी देत, 50 लाखाची खंडणी (Extortion) मागणाऱ्या 4 खंडणीखोरांना मानपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. संजय रामकिशन विश्वकर्मा, संदिप ज्ञानदेव रोकडे, धर्मदाज अंबादास कांबळे आणि रोशन गणपत सांवत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मानपाडा पोलिसांनी आठ तासाच्या आत गावकऱ्यांच्या वेशात सापळा रचत मुंबई- आगरा रोडवरील गोठेघर परिसरातून फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक (Arrest) करत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली.

पैसे देण्याच्या बहाण्याने दुकानाबाहेर नेले आणि अपहरण केले

डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिमंत नाहार यांचे डिलक्स प्लायवूड हे दुकान आहे. या दुकानात 3 ऑगस्ट रोजी त्यांच्या ओळखीचा संजय विश्वकर्मा नावाचा इसम आला. त्याने तीन लाखाच्या प्लायवुडची ऑर्डर देत पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगत नाहर यांना दुकानापासून काही अंतरावर घेऊन गेला. त्यानंतर आपल्या तीन इतर साथीदारांच्या मदतीने हिंमत नाहार यांना एका गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. त्यांना शहापूर परिसरात एका रूममध्ये ठेवून अपहरणकर्त्यांनी काही तासात हिंमत यांचे पुतणे जितू यांना फोन करून हिंमत यांना सोडण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. जितू यांनी या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला.

पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींच्या मुसक्या आवळल्या

वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे या पोलिस अधिकाऱ्यांची पथके नेमली. अपहरण करणारा व्यक्ती जितू यांना पैसे घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत होता. जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची चार पथके गावकऱ्यांच्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोड्याच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आली. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना माझ्या ताब्यात द्या असे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी झायलो कारला घेरले आणि सर्व खंडणीखोरांना ताब्यात घेतले. त्यानंतर गावातील एका खोलीत हिंमत नाहार यांना कोडून ठेवले होते. त्यांची त्या ठिकाणाहून सुटका केली. आरोपींकडून 5 लाख 32 हजार रूपयाची झायलो कार व 4 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. आठ तासाच्या आत पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये आरोपींना अटक करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. या कामगिरीमुळे मानपाडा पोलिसांच्या या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Businessman kidnapped on the pretext of withdrawing money from ATM in dombivali, four accused arrested)

हे सुद्धा वाचा