रिक्षातून चोर आले, रांगेतील चार दुकानं फोडली, इतक्यात आरडाओरड झाली आणि…
शिवाजीनगर भागातील सद्गुरु एम्पोरियम, पूनम एनर्जी पवार, आय केअर सेंटर अशा एकूण चार दुकानांना रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला
औरंगाबाद : रिक्षामधून आलेल्या चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने उचकटून रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य लंपास केले. औरंगाबादमधील पुंडलीकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजीनगर भागात बुधवारी पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. चोरी होताना आरडाओरड झाल्यामुळे चोरटे पुन्हा रिक्षातून पसार झाले.
लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र वृत्त देईपर्यंत दुकानदारांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे, ते स्पष्ट होऊ शकले नव्हते.
दुकानाचे शटर उचकटून प्रवेश
शिवाजीनगर भागातील सद्गुरु एम्पोरियम, पूनम एनर्जी पवार, आय केअर सेंटर अशा एकूण चार दुकानांना रात्रीच्या अंधारात चोरट्यांनी लक्ष्य केले. या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील रोख आणि विक्रीचे साहित्य लंपास केले.
स्थानिकाच्या आरडाओरड्यामुळे चोरटे पसार
दरम्यान, एका नागरिकाने आरडाओरड केल्याने चोरटे रिक्षातून पसार झाले. या घटनेची माहिती प्राप्त होताच पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पथकासह घटनस्थळाची पाहणी, पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमका किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
नाशकात पैठणीच्या दुकानात चोरी
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंगणगाव येथे नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या राजमाता पैठणी शोरुममध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शोरुमच्या मागील बाजूचे पत्रे कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर अंदाजे दीड लाख रुपये किमतीच्या महागड्या आणि दर्जेदार पैठण्या, तसेच गल्ल्यातील अंदाजे दहा हजार रुपयांची रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला.
संबंधित बातम्या :
CCTV | येवल्यात शोरुमचे पत्रे फोडून चोर शिरला, दीड लाखांच्या पैठण्यांची चोरी