हिरडी स्फोट प्रकरण! निष्पाप मजुरांच्या मृत्यूला जबाबदार कोण? गुन्हा दाखल, पोलिसांचा निशाणा कुणावर?
नाशिक जिल्ह्यातील हिरडी गावातील विहिरीचे काम सुरू करतांना धक्कादायक प्रकार घडला आहे. स्फोट होऊन तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी असून घटनेनंतर धक्कादायक बाब समोर आली आहे.
नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी गावात ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोदकाम सुरू असतांना जिलेटीनचा स्फोट झाल्याने तिघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची बाब समोर आली होती. यामध्ये बीड जिल्ह्यातील आष्टी येथील तीन मजुरांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती. हिरडी येथे विहिरीचे काम सुरू असतांना स्फोट झाला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी लागलीच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे एक जण गंभीर जखमी असल्याने त्याच्या माहितीवरुन रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरुन मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरंतर हिरडी येथे सुरू असलेल्या विहीर खोदकामाची परवानगीच नसल्याची बाब समोर आली आहे. गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीचे काम सुरू असतांना स्फोट झाला मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, नंतर माणूस ओरडण्याचा आवाज आल्याने तरुणांनी धाव घेतली होती.
गावातील तरुणांनी जखमींना तात्काळ शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यात एक जण वाचला तर इतर तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ग्रामपंचायतने या कामाला आम्ही परवानगी दिली नसल्याचे सांगत हात झटकले आहे.
तर पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमीच्या माध्यमातून हे काम केले जाणार होते. तर वर्क ऑर्डर निघालेली नसतांना काम सुरू करण्याची घाई कुणाला होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीवरुन ग्रामीण पोलिस अधिकचा तपास करत आहे. तर दुसरीकडे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांच्यासह इतर पोलिस अधिकारी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून विहीर सील केली आहे.
दरम्यान या प्रकरणी ठेकेदार आणि त्याचे इतर साथीदार यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा ग्रामीण पोलिसांनी दाखल केला असून अधिकचा तपास सुरू करण्यात आला असून धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.