‘त्यांच्या बापाची जहागिरी थोडी आहे’, बच्चू कडू प्रचंड संतापले

| Updated on: Mar 27, 2024 | 8:11 PM

भाजपकडून आज अखेर खासदार नवनीत राणा यांना पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं. पण त्यांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव कसा होईल, यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यांच्या बापाची जहागिरी थोडी आहे, बच्चू कडू प्रचंड संतापले
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला बच्चू कडू यांचा विरोध
Follow us on

खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून अधिकृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पण याला महायुतीमधील मित्रपक्षांचा तीव्र विरोध असल्याचं बघायला मिळत आहे. आमदार बच्चू कडू आणि शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आपण नवनीत राणा यांचं काम करणार नाही. याउलट नवनीत राणा यांचा कसा पराभव होईल, यासाठी आपल्याकडून प्रयत्न केला जाईल, असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ या दोन्ही नेत्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांचा सुरुवातीपासून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी या दोन्ही नेत्यांबद्दल मोठा दावा केला होता. बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ या नवनीत राणा जिंकून याव्यात यासाठी प्रचार करतील, असं रवी राणा म्हणाले होते. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर बच्चू कडू यांना रवी राणा यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. नवनीत राणा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही राणांच्या वक्तव्यानुसार त्यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न बच्चू कडू यांना विचारला असता “त्यांच्या बापाची जाहागिरी थोडीय”, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिलं.

‘नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार’

“आमचा विरोध कायम आहे. आम्ही कायम विरोध करु. आम्ही केल्या तक्रारीचा काही उपयोग झाला नाही. आम्ही आता बघू, एकंदरीत काय रणनीती आहे त्यापद्धतीने उमेदवार द्यायचा का, याबाबत निर्णय घेऊ. आम्ही नवनीत राणा यांचा शंभर टक्के प्रचार करणार नाहीत. नवनीत राणा यांच्यासाठी ही लढत तेवढी सोपी राहणार नाही. याचा रिझल्ट नक्कीच दिसेल. आम्ही नवनीत राणा यांना शंभर टक्के पाडणार”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं. “आम्ही आता विरोधात प्रचार करुन त्यांना महायुतीत ठेवायचं किंवा न ठेवायचं हा त्याचा प्रश्न आहे”, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

‘आम्ही लाचारी पत्कारणार नाही’

“आता काम सरो वैद्य मरो अशी अवस्था आहे. त्यांना असं वाटतंय की आमची काही गरज नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना एकंदरीत आमची गरज नाही. त्यामुळे आम्ही लाचारी पत्कारणार नाही. राणांनी काही करण्याचा संबंध नाही. आमचा विरोध कायम राहील. नवनीत राणा स्वत: भेटल्या तरी आमचा विरोध कायम राहील. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहू. याचा फटका कुणाला बसेल हा विचार आमच्यापेक्षा भाजपने करायला हवा. त्यांनीच मीठाचा खडा टाकला आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.