
लोकसभा निवडणुकीत कौल भाजपाप्रणित सरकारच्या बाजूने लागला आहे. असं असलं तरी भाजपाला आता मित्रपक्षांच्या आधारावर अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या निर्णय क्षमतेवर फरक पडेल हे आता स्पष्ट आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात भाजपा आणि मित्र पक्षांची पुरती दैना झाली आहे. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतरही भाजपा आणि मित्रपक्षांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने नव्या चिन्हावर निवडणूक लढवूनही प्रस्थापितांना दणका दिला आहे. मुंबईत ठाकरे गटाने जबरदस्त कामगिरी केली आहे. राहुल शेवाळे, यामिनी जाधव यांना पराभवाचं पाणी पाजलं आहे. तर नवनीत राणा यांनी भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही अपयश पदरी पडलं आहे. काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणावर येत्या काही दिवसात याचा प्रभाव पडेल यात शंका नाही.
मुंबई दक्षिण मध्य मतदार संघात ठाकरे गटाकडून अनिल देसाई आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्या लढत होती. ही लढत चुरशीची वाटत होती. पण यात अनिल देसाईंनी एकहाती बाजी मारली आहे. अनिल देसाई यानी राहुल शेवाळे यांचा 53,384 मतांनी पराभव केला. तर मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर आणि शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात चुरशीची लढाई झाली. रविंद्र वायकर यांचा काठावर विजय झाला आहे. रविंद्र वायकर यांनी अमोल किर्तीकर यांचा 48 मतांनी पराभूत केलं. मुंबईत या दोन ठिकाणी ठाकरेंची मशाल पेटली. तर एका जागेवर निसटता पराभव झाला.
अमरावतीतून भाजपाकडून नवनीत राणा आणि काँग्रेसकडून बळवंत वानखेडे यांच्यात लढत होती. मात्र नवनीत राणा यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढवून नवनीत राणा यांनी विजयाची चव चाखली होती. मात्र यावेळी भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवून काही एक फायदा झाला नाही. बळवंत वानखेडे 14214 मतांनी विजय मिळवला आहे.