1 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगतेय ही अभिनेत्री, लवकरच होऊ शकते सुटका, केलेली 102 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी
127 किलो सोन्याची तस्करी करणारी 32 वर्षाची प्रसिद्ध अभिनेत्री, जी गेल्या एक वर्षांपासून जेलमध्ये भोगतेय शिक्षा. लवकरच होऊ शकते अभिनेत्रीची सुटका. कोण आहे ती अभिनेत्री?

Gold Smuggling Case : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या राव गेल्या वर्षभरापासून कारागृहात होती. तिला मागील वर्षी 22 एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते. तिच्यावर सोने तस्करीचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात तिला विदेशी चलन संरक्षण व तस्करी प्रतिबंधक कायद्या अंतर्गत प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आले होते. या कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला भविष्यातील गुन्हे टाळण्यासाठी आधीच ताब्यात घेतले जाऊ शकते.
गुरुवारी सुटका होणार?
आता तिच्या नजरकैदेचा एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असून, लवकरच तिची सुटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रान्या रावला मार्च 2025 मध्ये अटक करण्यात आली होती आणि 22 एप्रिल 2025 पासून तिला प्रतिबंधात्मक नजरकैदेत ठेवण्यात आले. या काळात तिला न्यायालयाकडून जामीन मिळाला होता, मात्र COFEPOSA कायद्यामुळे तिला बाहेर येता आले नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आता हा कालावधी संपला असून आवश्यक कागदपत्रे पूर्ण झाल्यास गुरुवारपर्यंत तिची सुटका होऊ शकते. या बातमीमुळे तिच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
तपासादरम्यान असे समोर आले की रान्या राव ही मोठ्या सोने तस्करी रॅकेटशी संबंधित असल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या मते, हा लहान स्वरूपाचा गुन्हा नसून एका संघटित टोळीचा भाग आहे. या नेटवर्कद्वारे दुबईहून बेंगळुरूपर्यंत मोठ्या प्रमाणात सोने आणले जात होते. हा प्रकार दीर्घकाळ सुरू होता आणि यात अनेक व्यक्ती सहभागी होत्या. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये रान्या रावची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले जात आहे.
127 किलो सोन्याची तस्करी
माहितीनुसार, 2024-25 या कालावधीत या टोळीने 100 किलोपेक्षा अधिक सोने भारतात आणले होते. पुढील तपासात हा आकडा वाढून सुमारे 127 किलोपर्यंत पोहोचला. हे सोने विविध मार्गांनी देशात आणले जात आणि नंतर मध्यस्थांच्या मदतीने बाजारात विकले जाई. या प्रकरणात अनेक हँडलर, कॅरियर आणि ज्वेलर्स यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच तपास यंत्रणा या प्रकरणाला अलीकडच्या काळातील मोठ्या तस्करी प्रकरणांपैकी एक मानत आहेत.
तपास यंत्रणेनुसार, या नेटवर्कचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने चालत होते. सीमारेषा ओलांडून सोने आणण्यापासून ते ते बाजारात पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना जबाबदारी देण्यात आली होती. अशा प्रकरणांमध्ये कॅरियरचा वापर केला जातो, जे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. रान्या राव ही या संपूर्ण साखळीचा भाग होती असा आरोप आहे.
