पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने देखील वेगवेगळे निर्णय घेतले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार होता. त्यासोबतच पाकिस्तानमध्येही प्रदर्शित होणार होता. मात्र, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करणार नसल्याचे त्यांनी घोषित केले आहे.
सुनील शेट्टीचा आगामी ऐतिहासिक ड्रामा ‘केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ पाकिस्तानात रिलीज होणार नाही. काश्मीरच्या पहलगाम येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, चित्रपटाच्या निर्मात्याने आपला संताप व्यक्त करत ही मोठी घोषणा केली आहे. हा चित्रपट १६ मे रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
वाचा: शिमला करार नेमका काय आहे? जो रद्द करण्याची धमकी पाकिस्तान देत आहे
पाकिस्तानात चित्रपट रिलीज होणार नाही
‘केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ या ऐतिहासिक अॅक्शन-ड्रामामध्ये सूरज पंचोली, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १४व्या शतकात शूर योद्ध्यांनी सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी केलेल्या लढ्याची कथा पुन्हा जिवंत करतो. हा चित्रपट त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचा उत्सव साजरा करतो. आता त्याच्या रिलीज योजनेचा एक भाग दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. पाकिस्तान बाजारपेठ वगळता, ‘केसरी वीर’ भारत आणि इतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रांमध्ये, जसे की अमेरिका, गल्फ देश, युके आणि उत्तर अमेरिका येथे चित्रपटगृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च २९ एप्रिल रोजी मुंबईत प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्याने याला नैतिक भूमिका म्हटले
चित्रपटाचे निर्माते कनु चौहान यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, “मी माझ्या परदेशी वितरकांना स्पष्ट सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीत माझा चित्रपट पाकिस्तानात रिलीज होणार नाही. मला माझा चित्रपट पाकिस्तानात रिलीज करायचा नाही. मी काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. मी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘केसरी वीर’ पाकिस्तानात रिलीज होणार नाही. ही दहशतवादी हल्ल्यात आपले प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली आहे. ही माझी नैतिक भूमिका आहे.”
