ऐश्वर्या-अभिषेकने धूमधडाक्यात साजरी केली होळी; एकमेकांना लावले रंग

| Updated on: Mar 26, 2024 | 8:16 AM

बच्चन कुटुंबीयांकडून दरवर्षी धूमधडाक्यात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. यंदाही ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या, नव्या या सगळ्यांनी इतर कुटुंबीयांसोबत मिळून जल्लोषात होळी साजरी केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या-अभिषेकने धूमधडाक्यात साजरी केली होळी; एकमेकांना लावले रंग
बच्चन कुटुंबीयांची होळी
Image Credit source: Instagram
Follow us on

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बऱ्याचदा एकत्र दिसले. आता पुन्हा एकदा होळी आणि रंगपंचमीनिमित्त ऐश्वर्या आणि अभिषेक कुटुंबीयांसोबत एकत्र आले. रविवारी बच्चन कुटुंबीयांनी होलिका दहन केलं. त्याचे फोटो नव्या नवेलीने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर सोमवारी मित्रपरिवारासोबत दोघांनी रंगपंचमीसुद्धा खेळली. त्याचेही फोटो आता व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेकसोबतच त्यांची मुलगी आराध्या बच्चननेही धूमधडाक्याच रंगपंचमी साजरी केली. बच्चन कुटुंबीयांच्या होळी पार्टीचे फोटो पाहून त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

बच्चन कुटुंबीयांशी वाद होत असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्या रविवारी रात्री संपूर्ण कुटुंबासोबत होलिका दहन करताना दिसली. अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर होलिका दहनचे फोटो पोस्ट केले आहेत. यातील एका फोटोमध्ये ऐश्वर्या आणि आराध्यासुद्धा दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये नव्या तिच्या मामाला म्हणजेच अभिषेक बच्चनला रंग लावताना दिसतेय.

हे सुद्धा वाचा

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मुलगी आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमातही ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले होते. त्यानंतर ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळीसुद्धा अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘द आर्चीज’च्या प्रीमिअर कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी कॅमेरासमोर एकत्र मिळून फोटोसाठी पोझसुद्धा दिले. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून बिग बींचा नातू आणि श्वेता नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यामुळे संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसाठी हा कार्यक्रम खूपच खास होता.

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री होती. त्यानंतर हळूहळू भेटीगाठी वाढल्या आणि 2006-2007 पर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक आणखी वाढत गेली आणि त्याचवेळी ऐश्वर्या-अभिषेक एकमेकांच्या प्रेमात पडले.