Ramayana: 3 वर्षांपूर्वी दशरथ यांच्या भूमिकेसाठी दिलेलं ऑडिशन पण..; अजिंक्य देव यांचा खुलासा

अजिंक्य देव यांनी 'रामायण' या चित्रपटातील राजा दशरथ यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. तीन वर्षांपूर्वी त्यांनी हे ऑडिशन दिलं होतं आणि त्यात त्यांची निवडसुद्धा झाली होती. परंतु नंतर काय घडलं, याविषयीचा खुलासा त्यांनी केला आहे.

Ramayana: 3 वर्षांपूर्वी दशरथ यांच्या भूमिकेसाठी दिलेलं ऑडिशन पण..; अजिंक्य देव यांचा खुलासा
Ajinkya Deo and Arun Govil
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2026 | 3:34 PM

नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. रामायण या पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटात प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश आणि दशरथ यांच्या भूमिकेत अरुण गोविल आहेत. पण दशरथ यांच्या भूमिकेसाठी अरुण गोविल हे दिग्दर्शकांची पहिली पसंत नव्हते. यासाठी एका मराठी अभिनेत्याची निवड झाली होती. या अभिनेत्याने जवळपास तीन वर्षांपूर्वी ‘रामायण’ या चित्रपटातील दशरथ यांच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून अजिंक्य देव आहेत.

‘रामायण’ या चित्रपटात अरुण गोविल यांच्याआधी अजिंक्य देव हे दशरथ यांची भूमिका साकारणार होते. ‘मिड डे’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मी रामायण या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं होतं. माझं ऑडिशन हे दशरथ यांच्या भूमिकेसाठी होतं आणि ही जवळपास तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. परंतु जसजशा गोष्टी पुढे सरकल्या, तसं त्यात अरुणजी आले. ही सर्वांत चांगली गोष्ट होती. कारण दशरथ यांच्या भूमिकेसाठी ते सर्वोत्तम आहेत.” पुढे या मुलाखतीत अजिंक्य देव यांनी असंही स्पष्ट केलं की, जरी ते ‘रामायणा’त दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार नसले तरी या बहुचर्चित प्रोजेक्टमध्ये ते दुसरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.

“जरी मी या चित्रपटात राजा दशरथ बनू शकलो नसलो तरी नंतर निर्मात्यांनी मला विश्वामित्र यांच्या भूमिकेची ऑफर दिली. या भूमिकेसाठी मी लगेच होकार दिला, कारण रामायणात त्यांच्या भूमिकेचं महत्त्व काय आहे, हे मला ठाऊक आहे”, असं त्यांनी पुढे सांगितलं. ऋषी विश्वामित्र हे अत्यंत महान, शक्तिशाली आणि पूजनीय ब्रह्मर्षी होते. सुरुवातीला ते अत्यंत पराक्रमी क्षत्रिय राजा होते, ज्यांचं नावा राजा कौशिक असं होतं. नंतर त्यांनी कडक तपश्चर्या करून ब्रह्मर्षीपद मिळवलं. त्यांनीच जगाला अत्यंत पवित्र असा गायत्री मंत्र दिला. रामायणात ते प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे गुरू होते.

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळणार आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी, यश, अरुण गोविल, सनी देओल, विवेक ओबेरॉय, आदिनाथ कोठारे, रकुल प्रीत सिंह, रवी दुबे, लारा दत्ता यांसारख्या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us