370 च्या बिर्याणी वादावर अंकिता वालावलकरची थेट प्रतिक्रिया, प्रणित मोरेसह दोघांचं नाव घेत केलं मोठं वक्तव्य
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या 370 रुपयांच्या बिर्याणीच्या वादावर अंकिता वालावलकरची थेट प्रतिक्रिया. प्रणित मोरे, समय रैना, रणवीर अलाहबादिया यांच्याबाबतही केलं मोठं वक्तव्य.

सध्या सोशल मीडियावर 370 रुपयांच्या बिर्याणीचा वाद मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी प्रणित मोरेवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणावर आता अंकिता वालावलकरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली अंकिता? पाहूयात..
अंकिताच्या पोस्टमध्ये काय?
370 ची बिर्याणी सध्या चर्चेत आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये जे घडलं, ते पूर्णपणे चुकीचं होतं. मुलींवर असो किंवा मुलांवर, अशाप्रकारे सार्वजनिकपणे बोलणं चुकीचंच आहे. पण, एक गोष्ट मान्य करावी लागेल असे स्वस्त विनोद फक्त एकाच व्यक्तीकडून होत नाहीत. अनेकजण करतात… फरक एवढाच असतो की आपण कुठे बोलतो, कोणत्या व्यासपीठावर बोलतो आणि ते लोकांसमोर दाखवायचं की नाही, याचं भान असणं गरजेचं आहे.
पण समाज म्हणून आपण नेमकं इथेच अडकतो. समय रैना आणि रणवीर यांच्या बाबतीतही असंच झालं नव्हतं का? प्रचंड ट्रोलिंग, पोलिस केस, सर्वत्र चर्चा. लोकांनी त्यांच्यावर टीका केली. पण काही काळानंतर समय रैना परत आला. त्याने त्याच गोष्टी वेगळ्या शब्दांत मांडल्या, थोडा भावनिक झाला, डोळ्यात पाणी आलं… आणि मग आपणच त्याच्या कमबॅकची वाहवा केली. “What a comeback!” “Stay strong!” हेच इथेही होणार.
काही दिवस जातील. पुन्हा शो होतील. तुम्ही त्याच शोला जाल. पुन्हा जोक्स होतील. कुणीतरी म्हणेल, “आज मी बिर्याणी खायला आलोय.” आणि प्रणित मोरे म्हणेल, “बिर्याणी नाही भाई… तिचं नाव ऐकूनच मला भीती वाटते. मी सगळं खातो, बिर्याणी सोडून.” आणि त्या जोकवर समोर बसून हसायलाही कदाचित आपणच असू.
म्हणून प्रश्न फक्त एखाद्या Stand Up चा नाही. प्रश्न आपल्या सामूहिक स्मरणशक्तीचा आहे. आपण चुकीचा निषेध करतो, पण तिच चूक मनोरंजनाच्या नावाखाली पुन्हा स्वीकारतो. व्यक्ती बदलतात, वाद बदलतात; पण प्रेक्षक म्हणून आपली भूमिका मात्र तशीच राहते.
म्हणून टीका नक्की करा, पण ती सातत्याने करा. नाहीतर प्रत्येक वादाचा शेवट टाळ्यांमध्ये आणि प्रत्येक चुकीचा शेवट “कमबॅक” मध्ये होत राहील.
आपण त्या तत्सम लावणीच्या कार्यक्रमांनाही विरोध करतो. पण कालच मी एक पोस्ट पाहिली. एका एक वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. आता त्या एका वर्षाच्या मुलाला त्या कार्यक्रमातलं काय कळणार? त्याला ना गाण्यांचा अर्थ कळतो, ना नृत्याचं स्वरूप. मग हा निर्णय कोणाचा असतो? तो आई-वडिलांच्या आवडीचा आणि निवडीचाच भाग असतो.
“ज्याला जे आवडतं ते करू द्या” हा विचार ऐकायला खूप उदार वाटतो. पण समाजात प्रत्येक गोष्ट फक्त वैयक्तिक आवडीवर सोडून चालत नाही. कारण आपल्या निवडींचा परिणाम पुढच्या पिढीवर, सामाजिक मूल्यांवर आणि काय योग्य-अयोग्य मानलं जातं यावरही होत असतो.
म्हणून फक्त बोट दुसऱ्याकडे दाखवून उपयोग नाही. आरशात स्वतःकडे पाहण्याची तयारीही समाजाने ठेवायला हवी. कारण कलाकार रंगमंचावर असतो, पण त्या रंगमंचाला टाळ्या देणारे आपणच असतो.
