‘विश्वगुरू – विश्वगुरू म्हणणं बंद करा’, मोदी सरकारवर चिडल्या अनुराधा पौडवाल
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारत विश्वगुरू बनण्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या देशात जेवढ्या गोष्टी घडत आहेत, त्या विश्वगुरू न बनण्यासाठीच घडत आहेत, असं त्या म्हणाल्या.

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्यासोबतच करिअर आणि इतर अनेक मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाल्या. यावेळी त्यांनी राम मंदिरातील देणगीच्या चोरीवरही प्रतिक्रिया दिली आहे. अशाने भारत विश्वगुरू कसा बनणार, असा सवाल अनुराधा पौडवाल यांनी उपस्थित केला. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधर त्या म्हणाल्या की, “विश्वगुरू बनण्याची कल्पना आता चुकीच्या पद्धतीने घेतली जात आहे.”
शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत अनुराधा पौडवाल म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी माझ्याही मनात असं होतं की, भारत विश्वगुरू बनेल. मात्र आता मी जे पाहतेय, ते सर्व विश्वगुरूच्या पदाला उलथवून टाकणाऱ्याच गोष्टी जास्त घडत आहेत. हा सर्व मूर्खपणा बंद करा. आपण अधिकाधिक शिक्षित होऊ, असं म्हटलं जातंय. पण 93 हजार शाळा तर बंद पडल्या आहेत. 2047 पर्यंत भारत विश्वगुरू बनणार, असा दावा सरकार करत आहे. पण विश्वगुरू बनण्याचा मंच आहे तरी काय? राम मंदिराच्या देणगीतही लूट झाली. आम्हाला त्या गोष्टींची यादी पाठवा, जेणेकरून आम्ही त्यावर कारवाई करू शकू.”
या मुलाखतीत अनुराधा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणे व्यक्त झाल्या आहेत. त्यांनी पहिल्यांदाच असा खुलासा केला आहे की, त्यांनी फक्त त्यांचा मुलगाच नाही तर एक मुलगीही गमावली आहे. त्यांच्या सर्वांत मोठ्या मुलीचं 25 दिवसांतच निधन झालं होतं. या घटनेमुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या. अनुराधा पौडवाल यांनी हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. त्यांना एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार, सहा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन ओडिशा राज्य चित्रपट पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री’ देऊन सन्मानित केलं आहे. त्यांचा जन्म कारवारमध्ये एका मराठी भाषिक कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव अलका नाडकर्णी होतं. संगीतकार अरुण पौडवाल यांच्याशी लग्नानंतर त्यांनी नाव बदललं. 12 सप्टेंबर 2020 रोजी किडणी निकामी झाल्याने त्यांच्या मुलाचं निधन झालं होतं.
