RCB च्या जल्लोषादरम्यान चेंगराचेंगरी; 11 बळींवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया

बुधवारी सकाळी आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने खुल्या बसमधून विजयी मिरवणूक काढण्याचं जाहीर केलं होतं. विधानसौध ते चिन्नास्वामी स्टेडियम हे एक किलोमीटरचं अंतर आहे. मात्र दुपारी वाहतूक पोलिसांनी विजय मिरवणूक नसल्याचं स्पष्ट केलं.

RCB च्या जल्लोषादरम्यान चेंगराचेंगरी; 11 बळींवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया
बेंगळुरुतील चेंगराचेंगरीच्या घटनेवर अनुष्काची प्रतिक्रिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 9:28 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पहिल्या आयपीएल जेतेपदाच्या जल्लोषावेळी खेळाडूंच्या स्वागतासाठी जमलेल्या चाहत्यांच्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 47 जण जखमी झाले आहेत. बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतरही स्टेडियममध्ये खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या घटनेवर आता RCB टीममधील खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्याचप्रमाणे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमकडूनही अधिकृत निवेदन देण्यात आलं आहे.

आरसीबी टीमने त्यांच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय, ‘आज दुपारी टीमच्या आगमनाच्या उत्साहामुळे जमलेल्या गर्दीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्हाला खूप दु:ख झालं आहे. आमच्यासाठी सर्वांची सुरक्षितता आणि कल्याण अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांनी या घटनेत आपला जीव गमावला, त्यांच्याबद्दल आरसीबी शोक व्यक्त करते आणि पीडित कुटुंबीयांसाठी आम्ही संवेदना व्यक्त करतो. परिस्थितीची जाणीव होताच आम्ही आमच्या कार्यक्रमात तातडीने बदल केले आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचं, सल्ल्याचं पालन केलं. आम्ही आमच्या सर्व समर्थकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो.’

विराट कोहलीने आरसीबीची हीच पोस्ट शेअर केली आणि त्यावर लिहिलं, ‘मी नि:शब्द झालोय. मी अत्यंत निराश आणि दु:खी झालोय.’ तर अनुष्का शर्मानेही हीच पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये हार्टब्रोकनचे इमोजी पोस्ट केले आहेत. बुधवारी संध्याकाळी जल्लोषादरम्यान आरसीबी टीमच्या बसमध्ये अनुष्कासुद्धा उपस्थित होती. बंगळुरूतील रस्त्यांवर जमलेल्या गर्दीचे फोटो, व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला होता.

इतक्या मोठ्या संख्येने इथं क्रिकेटप्रेमी येतील अशी अपेक्षा नव्हती. परिसरात दोन ते तीन लाख नागरिक होते. तर विधानसौधानजीक एक लाख चाहते होते. मैदानाची क्षमता केवळ 35 हजार आहे, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नमूद केलं. मृतांच्या वारसांना दहा लाखांची मदत देण्यात येईल, तसंच या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं. या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपने राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकारवर टीका केली. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधात राजकारण करत असल्याचा आरोप केला.