तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नाही..; प्रयोग थांबवून प्रेक्षकाला सुनावल्याबद्दल आस्ताद काळेनं मांडली त्याची बाजू
नाटकादरम्यान मोबाइलचा मोठा आवाज झाल्याने आस्ताद काळे प्रेक्षकावर संतापला होता. प्रयोग थांबवून त्याने संबंधित प्रेक्षकाला फटकारलं होतं. याप्रकरणी आता त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत संपूर्ण घटनेविषयी सांगितलं आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांमधून मोबाइलचा मोठा आवाज झाल्याने अभिनेता आस्ताद काळे प्रचंड चिडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आस्तादने प्रयोग थांबवून त्या प्रेक्षकाला फटकारलं होतं. “आम्ही तुमच्या जागी फोनवर बोलतो, तुम्ही इथे येऊन नाटक सादर करा”, असं तो प्रेक्षकाला म्हणताना व्हिडीओत दिसला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांंनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता याप्रकरणी आस्तादने सविस्तर व्हिडीओ पोस्ट करत नेमकं तिथे काय घडलं होतं, याबद्दलची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
“नाटकादरम्यानचा माझा जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्याविषयी मला काही खुलासे करायचे आहेत. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, तो प्रेक्षक मोबाइलवर बोलत होता म्हणजे नेमकं तिथे काय घडलं होतं, हे अनेकांना माहीत नाही. आपण जेव्हा एखादं रील किंवा व्हिडीओ स्पीकर फोन ऑन ठेवून बघतो, तेव्हा जेवढा मोठा आवाज येतो, तेवढा मोठा आवाज झाला होता. संबंधित प्रेक्षक फोनवर स्पीकर ऑन करून बोलत होता की रील बघत होता, का फोन कानाला लावल्यावरही त्याच्या फोनमधून एवढा आवाज येत होता का, हे मला माहीत नाही. पण इतका मोठा आवाज झाला होता, हा पहिला खुलासा मी करू इच्छितो,” असं आस्तादने सांगितलं.
याविषयी तो पुढे म्हणाला, “दुसरी गोष्ट म्हणजे, आम्ही माणसच आहोत. तुमच्यासमोर स्टेजवर कला सादर करणारा नर्तक, नर्तकी, नट-नटी, गायक-गायिका.. जे तुमच्यासमोर लाइव्ह परफॉर्म करतात, तीसुद्धा माणसंच आहेत. त्यांना मदत करणारी बॅकस्टेजची मंडळी, दिग्दर्शक, त्यांचे सहवादक हीसुद्धा माणसंच आहेत. तिकिटं विकणारी आणि तिकिटं विकत घेऊन कला बघायला येणारीही तुम्ही माणसंच आहात. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप व्यवधानं आहेत, आपल्या डोक्यात विवंचना आहेत, खूप त्रास आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुमच्यासमोर एक जिवंत माणूस उभा राहून कला सादर करत असेल तर त्याची कदर असली पाहिजे, असं माझं तरी मत आहे.”
“मी माजुर्डा असेन, उद्धट असेन पण मी पाट्या टाकणारा किंवा अप्रामाणिक नक्कीच नाही. मी स्वत:शी खोटं बोलू शकत नाही. आमच्या आयुष्यात जे काही घडत असेल, ते सगळं बाजूला ठेवून, ठरलेले दोन-सव्वा दोन तास त्या रंगभूमीवर उभं राहून तुमची करमणूक करणं, हे आमचं काम किंवा जबाबदारी आहे. मी माझी जबाबदारी पार पडत असताना, तुमच्यापैकी काही जणांच्या बेजबाबदारपणामुळे माझ्या कामात व्यत्यय न येऊ देणं, हे प्रेक्षक म्हणून तुमचीही जबाबदारी नाही का? यात काही अवाजवी मागणी मी करतोय असं नाही,” असं त्याने टीकाकारांना विचारलं.
नाटकादरम्यानचा व्हिडीओ
View this post on Instagram
“कलाकारांचीही चूक असते, असं म्हणणारे काही जण कमेंट्समध्ये आहेत. ठीक आहे, पण प्रेक्षक म्हणून तुमचीही चूक आहे. आता काळ असाही नाही की नवीनच मोबाइल आहे तर सायलेंटवर कसा करायचा हे माहीत नाही. दुर्दैव म्हणजे, असं काही झालं तर पुन्हा त्याच भावनेनं कला पुढे सादर करत राहण्याची आम्हाला आता सवय करून घ्यावी लागतेय. तुम्ही तिकिटाचे पैसे देऊन आमचं नाटक बघायला येता, यासाठी अर्थातच आम्ही आभारी आहोत. पण तुम्ही तिकिटाचे पैसे दिलेत याचा अर्थ तुम्ही आमचं आयुष्य विकत घेतलेलं नसतं. हे आमच्या कला सादरीकरणाचे ते दोन तास, त्यात आम्ही सादर करणारी कलाच फक्त विकत घेतलेली असते. तुमच्याप्रमाणेच आजूबाजूच्या 100-150 लोकांनीही विकत घेतलेली असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा असं वागता, तेव्हा आमचा तर होतोच, पण त्या उरलेल्या लोकांचाही मोठ्या प्रमाणात रसभंग होतो. हा अधिकार तुम्हाला कोणीही दिलेला नाही,” अशा स्पष्ट शब्दांत त्याने आपलं मत मांडलं आहे.
या व्हिडीओच्या शेवटी तो म्हणाला, “तुम्हाला रसिक, मायबाप प्रेक्षक म्हटलं जातं, त्यामुळे अशा चुका करणं शक्यतो टाळा. बाकी मी तुम्हाला माजुर्डा, उद्धट वाटत असेन तर माझी काहीही हरकत नाही. काहींनी असेही कमेंट केले होते की, वाक्य विसरला असेल म्हणून अशी पळवाट शोधली असेल. मी त्यांना सांगू इच्छितो की, दुर्दैवाने किंवा सुदैवाने एखादी संहिता एकदा-दोनदा वाचल्यावर मला माझेच नाही तर इतरांचेही संवाद लक्षात राहतात. इमर्जन्सी असेल तर बाहेर जाऊन फोनवर बोलू शकता.”
