‘जब वी मेट’मधून काढून टाकताच बॉबी देओल संतापला, म्हणाला ‘दिग्दर्शक, अभिनेत्रीला मी आणलं..’
अभिनेता बॉबी देओलने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर प्रतिक्रिया दिली. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटासाठी सर्वांत आधी बॉबी देओलची निवड झाली होती. मात्र त्यानंतर काय झालं, याविषयीचा खुलासा बॉबीने केला.

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब वी मेट’ हा चित्रपट फक्त सुपरहिटच नाही तर एक कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. पडद्यावर या दोघांची जोडी खूप गाजली होती. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की सर्वांत आधी या चित्रपटात शाहिद कपूरऐवजी बॉबी देओलची आदित्यच्या भूमिकेसाठी निवड झाली होती. तेव्हा इम्तियाज अली या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार नव्हते. ऐनवेळी आपली जागा दुसऱ्या अभिनेत्याने घेतल्यामुळे बॉबी खूप निराश झाला होता. कारण त्यावेळी तो करिअरमध्ये अत्यंत कठीण काळाचा सामना करत होता. त्याला एका चांगल्या चित्रपटाची नितांत गरज होती.
इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’मध्ये शाहिद कपूरने रिप्लेस करणं हा बॉबी देओलच्या करिअरमधील सर्वांत मोठा झटका होता. कारण त्यानेच या चित्रपटासाठी दिग्दर्शक इम्तियाज आणि अभिनेत्री करीना कपूरला तयार केलं होतं. या चित्रपटाबद्दल सुरुवातीला जेव्हा चर्चा झाली, तेव्हा त्यात बॉबीसुद्धा सहभागी होता. तो स्वत: या चित्रपटाला वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसकडे घेऊन गेला होता. नंतर त्याला समजलं की ज्या बॅनर्सना त्याने चित्रपटाची कथा ऐकवली होती, त्यांच्यापैकीच एकाने ती कथा, तेच दिग्दर्शक आणि त्याच हिरोइनसोबत मिळून चित्रपट बनवला. पण मुख्य भूमिकेसाठी बॉबीच्या ऐवजी शाहिदची निवड केली.
‘आप की अदालत’ या कार्यक्रमात बॉबी म्हणाला, “आता ती कहाणी संपली आहे. आम्ही मित्र आहोत. परंतु त्यावेळी मी खूप दुखावलो होतो. कारण माझ्या करिअरसाठी त्यावेळी मला तशाच एका चित्रपटाची गरज होती. मला इम्तियाजवर तेव्हापासूनच खूप विश्वास होता, जेव्हा तो अभय देओलसोबत ‘सोचा ना था’ बनवत होता. मी त्या चित्रपटाचा रफ कट पाहिला होता आणि त्याच्या कामाने मी खूप प्रभावित झालो होतो. त्यावेळी मला असं जाणवलं होतं की ते खूप चांगले दिग्दर्शक आहेत आणि मला त्यांच्यासोबत एकदा काम करायला पाहिजे.”
इम्तियाज अली यांनी 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. या चित्रपटात बॉबीचा चुलत भाऊ अभय देओल आणि आयेशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. याविषयी बॉबी म्हणाला, “त्याचवेळी मी ठरवलं होतं की पुढे इम्तियाजसोबत चित्रपट करायचा. पण जेव्हा मार्केटमध्ये तुमची जागा मजबूत नसते, तेव्हा कोणीच तुमची साथ देत नाही. चित्रपट सुरू करण्याच्या प्रयत्नातच बराच वेळ निघून गेला होता. ज्या प्रॉडक्शन हाऊसला मी चित्रपटाची कथा ऐकवली होती, त्यांनी म्हटलं होतं की इम्जियात खूप महागडे दिग्दर्शक आहेत. मात्र नंतर त्याच बॅनरखाली हा चित्रपट बनला.”
बॉबीने पुढे स्पष्ट केलं की आता त्याच्या मनात याविषयी कोणतीच नाराजी नाही. “हे सर्व होत राहतं. आयुष्यात फक्त चांगल्याच गोष्टी होत नसतात. जेव्हा मी स्वत:वर मेहनत घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मी ठरवलं होतं की जे दु:ख आणि राग मी सहन केला, त्यालाच मी माझी ताकद बनवेन. तुम्ही दरवेळी रडत बसू शकत नाही. याच अनुभवांनी मला आणखी चांगली व्यक्ती आणि उत्तम अभिनेता बनवलं. यातून मला खूप काही शिकायला मिळालं. मला कोणाशीच तक्रार नाही.”